इस्लामविषयक स्वा. सावरकरांचे विचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |
 
 
प्रस्तुत लेखात सावरकरांच्या इस्लामविषयक विचारांचा परामर्श घ्यावयाचा आहे. सावरकरांनी मुस्लीम राजकारणाचे केलेले विश्लेषण अत्याधिक महत्त्वाचे असले तरी ते या लेखाच्या कक्षेबाहेर आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शतपैलू व्यक्तिमत्वात ‘दार्शनिक’ हा पैलू अत्यंत महत्त्वाचा आहे. मूलग्राही स्वतंत्र विचार, विवेकशील आणि विचक्षण चिकित्सा, संदर्भयुक्त आणि समतोल मांडणी, बिनतोड कोटिक्रम, तर्कशुद्ध आणि आत्मविश्वासयुक्त प्रतिपादन, नि:संदिग्ध आणि काटेकोर शब्दयोजना, विस्मयकारक भाषासौष्ठव, त्याला कुठे-कुठे उपरोधाची झालर ही दार्शनिक सावरकरांची वैशिष्ट्ये आहेत. ‘हिंदुत्व’ आणि ’हिंदुराष्ट्र विचार’ यांचे सावरकर अनन्य दार्शनिक आहेत. पण, सावरकर हिंदुराष्ट्राचा सर्वांगीण विचार करणारे असल्यामुळे या राष्ट्राच्या अनेक समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यांनी विचार केला यात आश्चर्य नाही. इस्लामच्या बाबतीत सावरकरांनी केलेला विचार दार्शनिक सावरकरांच्या वैशिष्ट्यांचा उत्तम नमुना आहे. महर्षी दयानंद, पं. लेखराम, स्वामी श्रद्धानंदप्रभृती आर्य समाजाच्या परंपरेतील काही नेत्यांचा सन्माननीय अपवाद वगळता, इस्लामचा असा मूलगामी विचार अन्य हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी केल्याचे दिसत नाही. इस्लामविषयक वस्तुनिष्ठ विचार मांडणारे सावरकर पहिले महाराष्ट्रीय दार्शनिक होत.
 
इस्लामचे अभ्यासक सावरकर
कुठलाही विषय मुळापासून आणि पूर्वग्रह बाजूला सारून करावयाचा असा सावरकरांचा दंडक होता. सावरकरांनी कुराण प्रथम इंग्रजीतून आणि नंतर बंगाली आणि मराठी अनुवादावरून वाचले. “अगदी मूळ वाचले म्हणजे त्याचा खरा स्वाद मिळेल, असा माझ्या मुसलमान मित्रांचा अभिप्राय पाहून त्यांच्याकडून प्रत्येक पान त्यांच्यासारखे शुचिर्भूत मने एकाग्र वाचून आणि हिंदी भाषांतर करवून ऐकले,” असं सावरकर सांगतात. पुढे पाश्चात्य दृष्टिकोनातून लिहिलेले कुराणावरील ग्रंथही त्यांनी वाचले. अरबस्तानात सुमारे २५ वर्षे राहिलेल्या जॉर्ज सेल (१६९७-१७३६) याने केलेले कुराणाचे इंग्रजीतील पहिले-वहिले अचूक भाषांतर (१७३४) सावरकरांनी वाचले होते. प्रसिद्ध आंग्ल इतिहासकार एडवर्ड गिबन (१७३७-१७९४) याने लिहिलेला ‘द हिस्टरी ऑफ द डिक्लाइन ऍण्ड फॉल ऑफ द रोमन एम्पायर’ हा सहा खंडांचा ग्रंथराज ज्ञानसाधक सावरकरांनी वाचला होता. त्याच्या दुसर्‍या खंडात इस्लामचा प्रारंभीचा इतिहास दिलेला आहे. न्या. अमीर अली यांच्या १८९८ साली प्रथम प्रकाशित झालेल्या ‘’ए शॉर्ट हिस्टरी ऑफ द सारासेन्स’ या ६४० पृष्ठांच्या ग्रंथाचे परिशीलन सावरकरांनी केले होते. सावरकरांना उर्दू लिहिता-वाचता येत असे हे या संदर्भात उल्लेखनीय आहे. ’केमाल पाशाने केलेले तुर्कस्थानातून अरबी संस्कृतीचे उच्चाटन, मुसलमानांच्या खिलाफतीचा उदय, र्‍हास आणि विनाश, मताबुतांची गोष्ट’(१९३४), ‘अंगरख्याला माणसे बेतणारा शिंपी’(१९३४), ‘तौलनिक धर्मविज्ञानदृष्ट्या मुसलमानांतील पंथोपपंथांचा परिचय’(किर्लोस्कर जुलै-ऑगस्ट १९३५), ‘मुसलमानी धर्मातील समतेचा टेंभा’(केसरी, १७ जानेवारी १९३६) या लेखांवरून सावरकरांनी केलेल्या इस्लामच्या गहन अभ्यासाची साक्ष पटते. शिवाय, हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून दिलेल्या सहा भाषणांत, तसेच वेळोवेळी इस्लामविषयक लिहिलेल्या लेखांत आणि काढलेल्या पत्रकांत सावरकरांनी मुस्लीम मानसिकतेवर आणि राजकारणावर अचूक भाष्य केले आहे. इस्लामचे मूलभूत सिद्धांत, इस्लामचा शतकव्यापी इतिहास, विविध इस्लामी पंथोपपंथ, त्यांच्यातील साम्य आणि भेद, विविध इस्लामी देशांचा इतिहास, मुस्लिमांचे देशी आणि आंतरराष्ट्रीय राजकारण, मुस्लीम मानस आणि व्यवहार या सगळ्या पैलूंबाबत सावरकरांचे आकलन सूक्ष्म आणि विश्लेषण भेदक आहे. इस्लाम आणि मुस्लीम समाज याबाबत सावरकरांची मते आज आणि उद्याही मार्गदर्शक असल्यामुळे ती अभ्यसनीय आहेत.
 
इस्लामी धर्मग्रंथप्रामाण्यावर टीका
‘विज्ञाननिष्ठ निबंध’ लिहिणार्‍या सावरकरांनी शब्दनिष्ठ श्रुतीस्मृति पुराणोक्त प्रवृत्तीवर करत असताना, इस्लामी धर्मग्रंथप्रामाण्यावरही टीका केली आहे. ’ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय?’ या लेखात ‘अल्लाह मुसलमानास साहाय्यार्थ देवदूतांची सैन्ये गुप्तपणे धाडतो,’ या इस्लामी श्रद्धेचा सावरकर विज्ञाननिष्ठ भूमिकेतून समाचार घेतात. “ऐहिक सामर्थ्याच्या अभावी मदिनेची घोडशाळा झाली,” असे सावरकर सांगतात. “इस्लामच्या (सावरकरांनी ‘मुसलमानी धर्म’ असा शब्द वापरला आहे) उदयासरशी अरब लोकांस आश्चर्यकारक विजय एकामागून एक मिळत गेले. ते मिळाले त्यांच्या चळवळीतील सामर्थ्याने, ‘भौतिक’ सामर्थ्याने आणि त्यांच्या शत्रूच्या भौतिक दुर्बलतेने. मुसलमान समजत होते तसे त्यांच्या मूर्तिभंजक तत्त्वज्ञानामुळे नव्हे,” असे विश्लेषण सावरकर करतात. ‘ताबुतांची गोष्ट’ या लेखात सावरकरांनी प्रेषित मोहम्मदाच्या निधनानंतर तत्कालीन मुस्लिमांमध्ये झालेल्या सुन्नी-शिया विभाजनाचा इतिहास तपशीलवार सांगितला आहे. तो सांगत असताना सावरकरांनी न्या. अमीर अली यांच्या उपरोक्त ग्रंथाचा आधार घेतला आहे. सेल, गिबन अशा पाश्चात्य इतिहासकारांचा आधार घेतला, तर बिगर-मुस्लीम लेखकांनी जाणूनबुजून चुकलेली माहिती सांगितली असा आरोप होईल, अशी टिप्पणी करण्यास सावरकर विसरत नाहीत. पहिल्या चार खलिफांचा इतिहास मराठीत प्रथम लिहिण्याचा मान सावरकरांना जातो. ‘अंगरख्याला माणसे बेतणारा शिंपी’ आणि ’ही खिलाफत म्हणजे आहे तरी काय?’ या दोन लेखांत सावरकरांनी हा इतिहास मांडला आहे.
 
साचेबंद इस्लाम
इस्लामी विचारसरणीचे सार सांगताना सावरकरांनी एक मर्मभेदक उपमा वापरली आहे. इस्लामी विचारसरणी कशी साचेबंद आहे हे सांगताना ‘अंगरख्याला जुळेल असे अंगच कापणारा शिंपी‘ अशी चपखल उपमा देतात. या अंगरख्याचा आकार ठरलेला आहे, तो कधीही बदलणारा नाही. त्या ठरलेल्या आकारापेक्षा निराळा अणुमात्र अधिक मोठा किंवा अधिक लहान असा अंगरखा शिवणे वा घालणे हे या शिंप्यांच्या शास्त्रात पाप समजले जाते. प्रत्येक माणसाने तसाच अंगरखा घातला पाहिजे. अगदी शिवणाचे टाकेदेखील ठरलेले. अंगरख्याची बाही शास्त्राप्रमाणे जितकी लांब असावी म्हणून त्यांचा पूर्वापार जातिनियम आहे, त्या बाहीहून जास्त लांबीचा हात असल्यास ते शिंपी गिर्‍हाईकाचा हात कापतील, बाहीची लांबी वाढवणार नाहीत. अंगरख्याच्या शास्त्रीय मानेतून त्या माणसाची मान अधिक असल्यास ते शिंपी ती मान तासून बेताची करतील, पण अंगरख्याच्या मानेचा घेर वाढवून, त्याच्या जातीच्या परंपरागत कुलधर्म ते मोडणार नाहीत. या शिंपीधर्माचा आणखी एक महत्त्वाचा सिद्धांत सावरकर सांगतात. तो हा की, “मनुष्य पापी की पुण्यवान, थोर की हलकट, उच्च की नीच हे त्या मनुष्याच्या अंगीच्या गुणावगुणांवरून ठरविणे पाखंड आहे, तर तो मनुष्य या ठराविक प्रकारच्या लांबीरुंदीचा हा धार्मिक अंगरखा घालतो की आपल्या आपल्या अंगास येईल नि बदलत्या वायुमानास जुळेल असे भिन्न आकाराप्रमाणे अंगरखे बदलीत राहतो, यावरून तो धार्मिक वा अधार्मिक, सात्विक वा तामसी, साधू वा ठग आहे हे ठरविले पाहिजे. जर तो अंगरखे अंगास बेतील, तर तो हलकट असलाच पाहिजे, जर तो आपले अंग त्या शास्त्रीय अंगरख्यास बेतील तरच तो थोर होय, साधू होय, धार्मिक होय! अशा या शिंपीधर्माच्या शिंपीमंडळींना अंगरख्यास आपली अंगे बेतू देणारी गिर्‍हाईके मिळतात कशी? आपल्या अंगच्या लांबीरुंदीच्या वा वायुमानाच्या सोयी गैरसोयीच्या बदलत्या आवश्यकतेप्रमाणे वापरील, तो माणूस घोर अशा नरकात पडेल,” असा शाप देणारी एक पोथी या शिंपीजातीपाशी असल्याचे स्पष्टीकरण सावरकर देतात. “कुराण नामक ही पोथी कोण्या मनुष्याने लिहिलेली नसून, प्रत्यक्ष ईश्वराने स्वतःच्या चाकूने, स्वतःचा बोरू तासून स्वतः लिहिलेली आहे, अशी मुस्लिमांची निष्ठा आहे. त्यामुळे त्यात दिलेले बारीकसारीक आचारदेखील त्रिकालाबाधित म्हणून मान्य होऊ लागले,” असे सावरकर लिहितात.
 
जी विज्ञानाची शोध-ज्योती (सर्चलाइट) सावरकरांनी हिंदू धर्मग्रंथांना लावली, तीच त्यांनी निर्भयपणे कुराणाला लावली. सावरकरांच्या ‘तौलनिक धर्मविज्ञानदृष्ट्या मुसलमानांतील पंथोपपंथांचा परिचय’ या दीर्घ लेखात कुराणाची रूपरेखा आहे. कुराणाची रचना, त्याची भाषा, अवतरण प्रक्रियेविषयी परंपरागत इस्लामी मत, त्याच्या स्वरुपाविषयी विविध इस्लामी मतमतांतरे, त्याच्या लेखनाचा इतिहास, त्याच्या आयतींतील अंतर्विरोध या सर्व मूलभूत मुद्द्यांचा परामर्श सावरकर एखाद्या कसलेल्या इस्लाम अभ्यासकाप्रमाणे घेतात. याच लेखात सावरकरांनी विविध इस्लामी पंथोपपंथांची तपशीलवार आणि बारकाईने चर्चा केली आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या काळात झालेल्या तथाकथित खोट्या प्रेषितांची चर्चाही सावरकरांनी केलेली आहे.
 
इस्लामी दुष्प्रचाराला प्रत्युत्तर
‘मुसलमानी धर्मातील समतेचा टेंभा’ हा लेख सावरकरांनी विशिष्ट परिस्थितीत लिहिलेला असला, तरी तो आजही प्रासंगिक आहे. आपण हिंदू धर्माचा त्याग करणार असल्याचे डॉ. आंबेडकरांनी घोषित केल्यावर त्यांना इस्लाममध्ये ओढण्याचे प्रयत्न सुरू झाले. कन्हैया लाल गौबा या पंजाब विधिमंडळाच्या धर्मांतरित मुस्लीम लीग सदस्याने डॉ. आंबेडकरांना तार पाठवून, इस्लाममध्ये समता असल्यामुळे त्यांनी त्यात प्रवेश करावा असे निमंत्रण दिले. या इस्लामी दुष्प्रचाराला सविस्तर उत्तर म्हणून सावरकरांनी हा लेख लिहिला. “आपला लेख बिनतोड असल्याचा आत्मविश्वास असल्यामुळे गौबा यांनी शक्य असल्यास आपण दिलेली उदाहरणे नाकारावीत,” असे आव्हान सावरकर देतात. “पृथ्वीची आणि मनुष्यजातीची विभागणी करणार्‍या, मुस्लिमेतरांना नरक सांगणाऱ्या अथवा त्यांना जिझिया कर लावणाऱ्या नाहीतर त्यांची कत्तल करणार्‍या इस्लामचा मूलारंभच विषमतेचा आहे,” असे सावरकर सांगतात. “इस्लामने मनुष्यजातीचे एकदम दोन तुकडे पाडलेले असून, मध्ये विषमतेची क्रूर भिंत पाताळापासून स्वर्गापर्यंत उभारलेली आहे,” असे निरीक्षण सावरकर नोंदवितात. पण, इथेच न थांबता सावरकर मुस्लीम समाजाच्या अंतर्गत समता आणि सहिष्णुता नांदत नाही हे उत्तमप्रकारे दाखवतात. मोहम्मदाचा कुरेश वंश शुद्ध व श्रेष्ठ ही इस्लामी समजूत, कुराणप्रणीत गुलामगिरीची पद्धत हे तात्त्विक भेद सांगत असताना मुस्लिमांमध्ये असलेली बेटीबंदी, अस्पृश्यता, भिन्न प्रार्थना स्थळे आणि कबरस्ताने अशा व्यवहारातील भेदांकडे सावरकर लक्ष वेधतात.
 
इस्लामचे सावरकरांनी वर्तविलेले भविष्य हिंदुस्थानात आपली राजकीय आणि धार्मिक सुलतानशाही पुनरपि प्रस्थापण्याची मुस्लिमांची महत्त्वाकांक्षा असल्याचा, वर्चस्व मिळवण्याचे त्यांचे ध्येय असल्याचा निष्कर्ष सावरकर काढतात. “त्यात मुस्लिमांचा दोष नसून, मुस्लिमांचा इतिहास, धर्मशास्त्र, जातिप्रवृत्ती यांचा मुळातच अभ्यास न करता, त्यांच्या हातचे बाहुले बनणार्‍या हिंदूंचा आहे,” असे सावरकर सांगतात. सावरकरांच्या इस्लाम आणि मुस्लीम राजकारणावर कठोर टीका करणार्‍यांनी, सावरकर मुस्लिमांचे खरे हितचिंतक होते हे लक्षात घेतले पाहिजे. ’क्ष किरणे’ या पुस्तकात तुर्कस्तानला अद्यतन करणार्‍या केमाल अतातुर्कचे उदाहरण देताना सावरकर “जर हिंदी मुसलमानांना तुर्कांसारखे प्रगत व्हावयाचे असेल, तर त्यांनीही हजारो वर्षांपूर्वीच्या रानटी धर्मवेडास सोडून, विज्ञानाची कास धरावी,” असा उपदेश हिंदुस्थानातील मुस्लिमांना देतात. सावरकरांच्या मते, इस्लामचे भवितव्य काय? ‘ही खिलाफत म्हणजे आहे तरी काय? या लेखाच्या शेवटी सावरकर पुढील भविष्यवाणी करतात - “त्या वीतभर कुराणाच्या पुठ्ठ्यांचे आत त्या अरबी पैगंबराने आपल्या ज्वालाग्राही विचारांची दारू ठसलेला तो कालध्वम भरून ठेवला. त्यात इतकी प्रचंड शक्ती साठलेली होती, की त्या लहानशा हातबॉम्बचा स्फोट होताच पॅरिसपासून पेकिंगपर्यंत आणि हंगेरीपासून हिंदुस्थानपर्यंत असणारे यच्चयावत राजवाडे आणि मठमंदिरे धडाधड कोसळून, त्यांच्या ठिकर्‍यान्या उडून गेल्या! आणि त्या विनाशाच्या भयंकर काळोखात अरबांचा अर्धचंद्र प्रकाशू लागला. परंतु, त्याचबरोबर हेही खरेच होते की कुराणाच्या त्या दोन पुठ्ठ्यांचे आतच अरब संस्कृतीच्या आरंभाप्रमाणे अंतही समाविष्ट असल्याने जेव्हा जग त्या दोन पुठ्ठ्यांत न मावण्याइतके विस्तीर्ण, उंच, रुंद आणि खोल विकास पावू लागले, तेव्हा त्यास सामावण्यास ती असमर्थ होऊ चालली. कुराणाअंतर्गत अरब संस्कृतीचीच ही गत होते, असे नव्हे, तर अपरिवर्तनीय अशा कोणत्याही धर्मग्रंथाच्या दोन पुठ्ठ्यांतच सारे जग आणि सर्व काळ डांबून ठेवू पाहणार्‍या कोणत्याही संस्कृतीची आज ना उद्या अशीच गत होत असते. त्या धर्मग्रंथांच्या पहिल्या पानात आविर्भूत होणारी नावशक्ती त्याच्या शेवटच्या पानापर्यंत कार्य करीत आली की, त्यापुढे नित्य बाहेर जाणे तिला निषिद्ध असल्याने तिला तिथेच आळा पडलाच पाहिजे.”
 
अध्ययन, चिंतन आणि विश्लेषणाचे अधिष्ठान असल्यामुळे सावरकरांनी विविध विषयांबाबत केलेली भविष्यवाणी नेहमीच खरी ठरली. इस्लामच्या बाबतीतही त्यांची भविष्यवाणी त्याला अपवाद कशी असणार?
 
 
 
 
 
डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले

 
 
@@AUTHORINFO_V1@@