नवी दिल्ली : महिलांवरील अत्याचार या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कालमर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव नुकताच सरकारकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता बाल वयात झालेल्या अत्याचारांची तक्रार महिला तिच्या तरुणपणी देखील करू शकणार आहे. बालवयात काही कळत नसल्याने मुलीला हे अत्याचार अथवा शोषण आहे याची जाणीव नसते त्यामुळे ती मोठी झाल्यावर या अत्याचाराची जाणीव आल्यावर त्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवू शकते असे या प्रस्तावात म्हटले गेले आहे.
तक्रार उशिरा केल्याने कोणतीही महिला अथवा मुलगी न्यायापासून वंचित राहू नये तसेच तिच्यावर अन्याय होवू नये म्हणून हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाने हा प्रस्ताव कायदे मंत्रालयाकडे पाठविला आहे. बाल वयात अत्याचार झालेल्या मुलीला यामुळे काही वर्षांनी देखील तक्रार नोंद करता येईल असे या प्रस्तावात सांगण्यात आले आहे.
अत्याचारित बालक १८ वर्ष अथवा २५ वर्षांचा होईपर्यंत आपली तक्रार नोंदवू शकतो असा देखील प्रस्ताव मांडण्याचा विचार महिला आणि बालविकास मंत्रालय करीत आहे. यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही तसेच सगळ्यांना न्याय मिळेल असे म्हणण्यात आले आहे.