बेंगळूरू : 'येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देशात मोठा राजकीय बद्दल होणार असून आज झालेला शपथविधी हा नव्या बदलाची नांदी आहे' अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज दिली आहे. मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर बेंगळूरु येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
'मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी आज देशातील सर्व राजकीय नेते एका व्यासपीठावर उपस्थित होते. खरे म्हणजे हा सर्व देशाला आणि सत्ताधाऱ्यांना एक संदेश आहे कि, आम्ही सर्व एक असून देशहितासाठी आम्ही सर्व जण नेहमी तत्पर आहोत. त्यामुळे २०१९ मध्ये देशात सर्वात मोठा राजकीय बदल होणार असून आजचा शपथविधी हा या नव्या बदलांची नांदी आहे' असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच जेडीएस आणि कॉंग्रेस यांचे आघाडी सरकार हे राज्यातील आतापर्यंतचे सर्वात स्थिर आणि उत्तम सरकार असेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. याचबरोबर राज्यातील भाजपवर टीका करताना ज्या पक्षाला दोन दिवस देखील राज्यात सत्ता टिकवता आली नाही. ते राज्याचा विकास काय करणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कर्नाटकची सत्ता ही जेडीएस आणि कॉंग्रेसनेच खऱ्या अर्थाने राखली असून कर्नाटक सरकार हे देशातील सर्वात उत्तम सरकार ठरेल, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.
कर्नाटक विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात झालेल्या राजकीय नाट्यनंतर अखेरकार राज्यामध्ये जेडीएस आणि कॉंग्रेस पक्षाचे सरकार अस्तित्वात आले आहे. कॉंग्रेसच्या पाठींब्यानंतर जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री म्हणून तर कॉंग्रेस नेते जी.परमेश्वरा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली आहे. यावेळी देशभरातून सर्व विरोधक या सोहळ्यासाठी बेंगळूरू येथे उपस्थित झाले होते. दरम्यान देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच देशातील सर्व विरोधी पक्ष एकाचा व्यासपीठावर येण्याची घटना घडली आहे, हे विशेष.