दिक् व काल : विश्वव्यापी व विश्वगामी हेरांची जोडगोळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2018
Total Views |
तसं माणसाचा मेंदू हाच शरीराचा चालक नियंत्रक, एका अर्थी शरीरातील माहिती जाळ्याचा प्रमुख. मन व आत्म्यांची आज्ञा घेऊन त्यानुसार विविध कामे करून घेण्यासाठी झटणारा नियंत्रकच. पण त्याचं काम चालतं ते मात्र शरीराच्या नसानसांत पसरलेल्या लहानलहान चेतापेशींमध्ये. शरीराला कुठल्याही कोपऱ्यात काहीही खुट्ट झालं की लगेच कळलंच समजायचं मेंदूला. शरीरात हे जसे चेतापेशींचे जाळे तसे राज्यात हेरांचे. वेगवेगळ्या वेषात सर्वत्र फिरून साऱ्या राज्याची नस जाणणारे, खडानखडा माहिती ठेवणारे हे हेर तसे दिसत नाहीत राजसैनिकांरखे घोड्यांवरून जाताना. पण ते असतात मात्र खास. यांच्या करवीच तर राज्यातील लहान सहान घटना कधी घडल्या, कुठे घडल्या हे कळतं. खासकरून गुन्हे साबित करताना तर ही माहिती अतिमहत्त्वाची. न्यायदानातला, दंडनीतीमधला पुराव्याचा भाग तर यांच्या सहाय्यानेच पुरा होतो.

“काय रे विक्रमा, तू या जंगलात आलास तरी अजूनही राज्याचा, प्रजेचा विचार सोडला नाहीस? राज्यातल्या प्रधानांवर तुझा विश्वास नाही?”
 
“वेताळा, राज्यातल्या प्रधानांवर, सेनापतींवर माझा विश्वास आहेच, पण त्याहीपेक्षा माझा विश्वास माझ्या गुप्तहेरांवर आहे. कारण ते फारसा काही स्वार्थ न साधताच राजाची कामे करतात. सतत जागरुक राहतात. राज्यातल्या घडामोडींवर पाळत ठेवतात. ते अतिशय विश्वासु आहेत. कारण ते अतिस्वार्थी नाहीत, सत्ताभिलाषी नाहीत.”
 
“अरे हो हो राजा. मान्य आहे. पण तू आपल्या नेहमीचा चर्चेचा विषय विसरलास का ? का तुला म्हणायचंय की पदार्थविज्ञानातही असे हेर आहेत?”
 
“अगदी बरोबर ताडलंस वेताळा, पदार्थविज्ञानातही असे नि:स्वार्थ काम करणारे हेर आहेत. अर्थात ते कोणत्या राजासाठी कामे करत नाहीत. ते द्रव्यरूपात आहेत, स्वात्मन्यारम्भकत्व म्हणजे स्वत:मध्ये बदल करू शकतात, त्यांचे काही गुण आहेत, ते भूतद्रव्यांची निर्मिती पाहतात, त्यांचे रुपांतरण पाहतात, त्यांच्या हालचाली पाहतात. पण ती द्रव्ये भूतद्रव्यांच्या आहारी जात नाहीत. तेज त्यांना सैलावत नाही. स्थायू त्यांना ढकलत नाही ते स्थायूंना ढकलत नाहीत..”

“अरे कोण आहेत हे?”

“ही द्रव्यांची जोडगोळी म्हणजे काल (time) व दिक् (space)..”

“अरे हो.. मागच्या वेळी आपण बोलत होतो यांच्याबद्दल.. बर मला सांग प्रशस्तपादांनी काय म्हटलंय यांच्याविषयी?”

“वेताळा, प्रशस्तपादऋषींनी पदार्थधर्मसंग्रहाच्या तिसऱ्या धड्यात मूर्त व अमूर्त द्रव्ये एकामागोमाग सांगितली आहेत. हेतू हा की त्यांची परस्परपूरकता ठसावी.  म्हणजे बघ, दुसऱ्यांकडून कामे करुन घेणाऱ्या द्रव्यांबद्दल त्यांनी सांगितले - 


क्षितिजलज्योतिरनिलमनसां क्रियावत्त्वमूर्त्तत्वपरत्वापरत्ववेगवत्वानि ||23||

स्थायू, द्रव, वायू, तेज व मन हे हालचाल करत असतात, त्यांना जाणीव स्वरूप असते, ते जवळ येऊ शकतात व लांब जाऊ शकतात आणि ते बलप्रयोग करून गती निर्माण करू शकतात.
 
यांच्यानंतर लगेचच्या श्लोकात त्यांनी अमूर्त द्रव्ये, म्हणजे आकाश (plasma), काल (time), दिक् (space) व आत्मा (Soul) यांविषयी म्हटलंय.
 
 
आकाशकालदिगात्मनां सर्वगवत्वं परममहत्त्वं सर्वसंयोगिसमानदेशत्वश्च ||24||
 
 
To Akasha, Time and Space, belong the characters of – being all pervasive, having the largest dimensions, and being the common receptacle of all corporeal things.
 
 
आकाश, काल, दिक् व आत्मा हे सर्वव्यापी आहेत, ती आकाराने विस्तीर्ण आहेत व सर्व मूर्त गोष्टींना ती आश्रय देतात.”
 
“ही अदृष्य, अमूर्त द्रव्ये आश्रय देणार तो कसा ? ज्यांना स्वत: लाच काही दृष्य अस्तित्त्व नाही ते दुसऱ्याला काय आश्रय देणार?”

“वेताळा, एका अर्थी तुझं बरोबर आहे. पण असं पाहा की पृथ्वी, आप, तेज व वायु यांच्या अस्तित्वाला सतत घोर लागलेला असतो. तेजाने काही कमी जास्त केलं की स्थायूचा झाला द्रव मग वायू. पुन्हा थंडावा आला की पुन्हा उलटी गंगा. शिवाय ही द्रव्ये सतत एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न. म्हणजे स्थायुरूप डोंगर आपरुप नदीला आडवणार. मग त्याबद्दल नदी डोंगराला भगदाडे पाडणार, खळगे पाडणार. शिवाय सूर्याच्या तेजरूपाने पाण्याची वाफ व्हावी, मग हे ढग वाऱ्याने ढकलावेत व मग काही अंतरावर पुन्हा ढगातून पाणी खाली यावे. असं सारखं चालावं. सूर्यकिरणं पृथ्वीवर पोहोचावी. पक्ष्यांचे ध्वनी सर्वत्र पसरावे. अशा या द्रव्यांच्या सततच्या गोंधळात, धांगडधिग्यात या घडामोडींच्या नोंदी ठेवतात ते ही काल व दिक् ही द्रव्ये. कालामुळेच आधी-नंतर, पुन्हा-पुन्हा, कधीतरी, नेहमीच असे सारे संदर्भ आकाराला येतात.”
 
आणि दिक् हे काय संदर्भ देते?
 
वेताळा, दिक् हे काळाबरोबर, मना बरोबर असते. काळ जिथे संदर्भात वापरला जातो तिथे दिक् सुद्धा पर्यायाने येतोच. म्हणजे बघ, 
 
 
क्षितिजलज्योतिरनिलमनसां क्रियावत्त्वमूर्त्तत्वपरत्वापरत्ववेगवत्वानि ||23||
 
 
स्थायू, द्रव, वायू, तेज व मन हे हालचाल करत असतात, त्यांना जाणीव स्वरूप असते, ते जवळ येऊ शकतात व लांब जाऊ शकतात आणि ते बलप्रयोग करून गती निर्माण करू शकतात. या दादागिरी करणाऱ्या पाच द्रव्यांनी जी ढकलाढकली केली, द्रव्ये किती लांब गेली, किती जवळ आली याचं मोजमाप दिक् द्रव्यामुळे मिळत राहतं.

शिवाय,


आकाशात्मनां क्षणिकैकदेशवृत्तिविशेषगुणवत्त्वम् ||31||

Akash and the Souls have such specific qualities as last only a single moment and exist only over certain parts of their substrates.


आकाश व आत्मा हया द्रव्यांचा विशेष गुण म्हणजे ती एका क्षणाला एका ठिकाणी असतात तर दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या. तर यातल्या आकाशद्रव्यातली जी कंपने, लहरी आहेत त्यांच्या उगमस्थानाच्या नोंदी, त्या लहरी कुठल्या कुठल्या द्रव्यातून गेल्या या नोंदी दिक् तत्व ठेवते. कारण क्षणिक काळापुरतं का होईना पण या लहरी मूर्तद्रव्यांचा आश्रय घेतातच घेतात.

काही उदाहरण दे रे..

म्हणजे बघ वेताळा, शंखाचा ध्वनी निर्माण करण्याची परंपरा आहे. पूजेच्या वेळी तो करतात. महाभारतात युद्धाच्या सुरुवातीला तो केला गेला होता. यात प्रथम शंखनाद करणारी व्यक्ती तोंडावाटे हवा शंखात सोडते. तो आवाज न ऐकु येणारा असतो. शंखात आवाज ऐकु येऊ लागतो. मग तो ध्वनी आजुबाजूच्या हवेवर स्वार होऊन पुढेपुढे जात राहतो. म्हणजे तो ध्वनी एका क्षणाला शंखात, लगेच शंखापासून एका फुटावर मग २ फुटावर असा जात राहतो. इथेही दिक् द्रव्य नोंद ठेवत राहते.




“ते ठिक आहे विक्रमा, मला वाटतं दिक् व काल हे तू म्हटलास तसं कायमच चालत असतं. पण आपण त्याची किती नोंद ठेवणार? सतत दिक् व काल नोंदी ठेवत राहिलो तर मुख्य कामेच होणार नाहीत..श्वास घ्यायलाही फुरसत मिळणार नाही..”

“वेताळा, यासाठीच तर प्रशस्तपादांनी निमित्त कारण हा शब्द वापरलाय -


दिक्कालयो: पञ्चगुणवत्त्वं सर्वोत्पत्तिमतां निमित्तकारणत्वञ्च ||32||


Space and time have the common character of having five qualities, and that of being the instrumental cause of all that has origin.


दिक् व काल यांत पाच समान गुण असून त्याशिवाय निर्माण झालेल्या सर्वांच्या उत्पत्तीचे ती निमित्तकारण आहेत. यात निर्माण झालेल्या गोष्टी म्हणजे हालचाली, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे अशा सर्वच बदलांची नोंद घ्यायची वेळ येते त्या निमित्तापुरतीच दिक् व काल यांची नोंद घ्यायची व आपले कार्य करत राहायचे.”
“मग आपण निमित्तापुरते पाहत असू तर इतर वेळी त्यांची नोंद कोण ठेवते?”

“वेताळा, कालमापनाचे नऊ प्रकार सूर्यसिद्धांत या पुस्तकाच्या मानाध्याय प्रकरणात दिलेले आहेत.


ब्राह्मं दिव्यं तथा पित्र्यं प्राजापत्यं च गौरवम् | सौरञ्च सावनं चान्द्रं आर्क्षं मानानि वै नव ||

यातील पहिल्या ६ म्हणजे ब्राह्म, दिव्य, पित्र्य, प्रजापत्य, गौरव व सौर ह्या सहा पद्धतींचा विश्वाच्या उत्पत्ती पासूनचा काळ मोजण्यासाठी उपयोग होतो. चान्द्रमानाचा (lunar) उपयोग सण व धार्मिक विधींसाठी होतो. सावन (solar) दिन व नक्षत्र (sidereal) दिन यांचा उपयोग ग्रहांच्या हालचाली विषयी माहिती देण्याकरता होतो. सावन दिनाचा उपयोग तर नवीन काळातील कालमापनासाठीही होतो. (Physics in Ancient India – N.G. Dongre, S.G. Nene). भारतीय पंचांगांनुसार तर पुढच्या व मागच्या कैक हजार वर्षांचे चंद्रोदय व अस्त अचूक ओळखता येतात.”
“आणि विक्रमा, दिक् या द्रव्याचं काय?”

“दोन अणूंमधील सूक्ष्म अंतरापासून ते दोन ग्रहांमधील महाकाय अंतरांपर्यंत मोजमापे करण्यासाठी काही त्रासरेणू इतक्या अंतरापासून कैक योजने इथपर्यंत वेगवेगळी मापने शोधली गेली.”

“हे तर ठीक आहे विक्रमा, पण पृथ्वीवर कुठेही काहीही झालं तरी त्याजागेची अचूक माहिती कळण्यासाठी तुम्ही काही केलं नाही का?”

 

“हो केलेना वेताळा. पृथ्वीगोलाच्या कंबर पट्ट्यासारख्याच असणाऱ्या काल्पनिक विषुववृत्ताला समांतर असे पृथ्वीचे गोलाकार काप केले तर प्रत्येक चकतीचे अक्षांश (latitude) सारखे असतील. याच गोळ्याचे अक्षाला समांतर असे उभे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याचे रेखांश (longitude) सारखे असतील.” अशारितीने तुकडे केल्यावर मग पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणची अचूक माहिती दुसऱ्याला देता येईल. पदार्थविज्ञानाच्या संदर्भात म्हणशील तर आधुनिक काळात संदर्भचौकट (frame of reference) या संकल्पनेचा उदय झाला. यात कार्टेशियन चौकट व सहनिर्देशक (Cartesian coordinates ), चक्री चौकट (polar coordinates) या होत्या.


 


“काल व दिक् यांची माहिती घेता घेता आपण किती काळात किती चालत आलो ते कळलं नाही. सौर दिन व नक्षत्र दिन यांमधला फरक कळला नाही. पण विक्रमा मला आता या विस्थापनांचा अंदाज घ्यायची इच्छा झाली आहे. विस्थापन, वेग याविषयी पूर्वीही बोललेलो आहे. पण सुरुवातीला मला उष्णतेचे वहन जाणून घ्यायचे आहे. त्या वहनात द्रव्याच्या रेणूंचे विस्थापन कसे होते हे पाहायचंय. पण आता मी येतो राजा. मला जायला हवं. पुन्हा भेटू, नक्की. हाऽहाऽऽहाऽऽऽ”

पदार्थ विज्ञानाचा तास संपला तरी सर्वांची अजून जाणून घेण्याची इच्छा काही संपलेली नव्हती. किंबहुना ती वाढतच होती. आजपुरती सर्वांनी उसंत घेतली इतकंच..
(क्रमश:)
- अनिकेत कवठेकर
@@AUTHORINFO_V1@@