नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष कर्नाटकमध्ये जनादेशची अवहेलना करत असून जनतेच्या मतांची हत्या करत आहे असे मत भारतीय जनता पक्षाचे नेते संबित पात्रा यांनी मांडले आहे. आज नवी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस काही दिवसांपूर्वी भारतीय न्यायव्यवस्थेवर बोट उठवीत होती. आता काँग्रेस चक्क जनादेशची अवहेलना करत आहे असे ते यावेळी म्हणाले.
मला आशा आहे की काँग्रेस भविष्यामध्ये न्यायव्यवस्थेचा आदर करेल. विजय नेहमी न्यायाचा आणि लोकतंत्र यांचा होत असतो. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाची तुलना पाकिस्तानसोबत करत होते. ही तुलना काँग्रेसचे दडपण दाखवते असे ते यावेळी म्हणाले. कर्नाटक निवडणुका या काँग्रेससाठी लाख मोलाच्या होत्या मात्र यात त्यांना पाहिजे तसा विजय मिळविता आला नसल्याने काँग्रेस चिडली आहे असेही ते यावेळी म्हणाले.