लाखो रूपयांचे झाले नुकसान
जळगाव :
शहरातील एमआयडीसी परिसरातील जे ११३ सेक्टरमधील ‘श्री पॅकर्स’ या कोरूगेटेड पेपर्स व बॉक्सची निर्मिती करणार्या कंपनीत सोमवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास प्रोडक्शन विभागात अचानक आग लागली.
आगीत कागदाचे रोल्स्, गम पेस्ट, मशिनरी यासह अनेक साहित्य व तयार माल जळाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे निदर्शनास आले. आग इतकी भयंकर होती की, तब्बल ६ बंबांच्या सहाय्याने आग विझविण्यात यश आले. जैन इरिगेशनचे २ फायर बंब, सुप्रीमची फायर टीम व महानगरपालिकेचे बंब यावेळी पाचारण करण्यात आले होते.
श्री पॅकर्स या कंपनीत लागलेल्या या भीषण आगीचे स्वरूप अतिशय भयानक होते. आगीचे लोण उसळत होते. मोठ्या अथक प्रयत्नातून आग आटोक्यात आणता आली. या आगीमुळे कंपनीचे ३० लाखाहून अधिक रूपयांचे नुकसान झाले. मात्र यावेळी फॅक्टरी बंद असल्यामुळे कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याची माहिती श्री पॅकर्सचे संचालक राजीव बियाणी यांनी दिली. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आगीमुळे कंपनीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आलेला आहे.