कर्नाटकचा ‘उत्तर प्रदेश’ होईल ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2018   
Total Views |



योगायोग असा आहे की, उत्तर प्रदेश प्रमाणेच कर्नाटकातही तिरंगी लढत आहे. या तिरंगी लढतीमध्ये देवेगौडांचा पक्ष तिसरा आहे. उत्तर प्रदेशात अखिलेशचा समाजवादी पक्ष सत्तेत व मायावती त्याच्याशी तुल्यबळ असा पक्ष होता. पण, विधानसभेच्या लढतीमध्ये समाजवादी व भाजप अशा लढतीमध्ये मायावतींचा बसपा चिरडला गेला व जमिनदोस्त होऊन गेला. ‘मोदी’ नावाच्या वादळासमोर अखिलेशचा समाजवादी पक्ष पालापाचोळा होऊन गेला, तर त्याच्याच कुबड्या घेऊन लढणार्‍या काँग्रेसला आपल्या मुठभर जागाही टिकवता आल्या नाहीत. कर्नाटकात नेमकी तशीच स्थिती आहे.

१९९८ नंतर भारतात मतचाचण्यांचे युग सुरू झाले. प्रणय रॉय याला त्यातूनच ‘राजकीय विश्लेषक’ म्हणून आपली ओळख मिळाली. आरंभी राजकीय अभ्यासक आणि राजकीय पत्रकार या शास्त्रावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. पण, पुढल्या काळात मतचाचण्यांचे शास्त्र विस्तारत गेले आणि अनेकजण त्यात उतरत गेल्यावर आता प्रत्येक लहानमोठ्या निवडणुकीच्या चाचण्या ही नित्याची गोष्ट होऊन गेली आहे. पण, जेव्हा या चाचण्यांची जाहीर चर्चा व परिसंवाद होऊ लागले, तेव्हा त्यात शास्त्राला फाटा मिळाला आणि त्याचाही राजकीय प्रचारासाठी सरसकट गैरवापर होऊ लागला. पण, बातमीदारीत तो एक मनोरंजक खेळ होऊन गेला. कुठल्याही माहितीत भेसळ केली तर दोष माहितीचा नसतो, भेसळ करणारा गुन्हेगार असतो. म्हणूनच माहितीला दोष देता येत नाही. माहितीचा अर्थ लावणारा लबाड असेल, तर माहिती चुकीची नसते. मतचाचण्यांच्याही बाबतीत तेच झाले. आरंभीच्या काळात प्रणय रॉय ‘तज्ज्ञ’ म्हणून काम करीत असे आणि हळूहळू त्याचे व्यावसायिक हितसंबंध निर्माण झाले. मग त्याचेही अंदाज फसू लागले. त्याच्या तुलनेत आता या उद्योगात आलेले अनेकजण मुळचेच व्यावसायिक असून, त्यांना मिळणार्‍या उत्पन्नाची महत्ता वाटू लागली असेल, तर अंदाज फसत गेले तर नवल नाही. आताही कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने अनेक मतचाचण्या समोर आल्या आहेत. कोणीही विधानसभेत कुठल्या पक्षाला स्पष्ट बहुमताचा अंदाज व्यक्त केलेला नाही. पण, नेमकी अशीच स्थिती वर्षभरापूर्वी उत्तर प्रदेश विधानसभा वा त्याहीपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत झालेली होती. कुठलीच चाचणी बहुमताचे भाकित करीत नसताना आलेले निकाल धक्कादायक होते. कर्नाटकातली त्रिशंकू विधानसभेचा अंदाज म्हणूनच तोंडघशी पडण्याची आता खात्री वाटू लागली आहे. किंबहुना, कर्नाटकचा ‘उत्तर प्रदेश’ होणार असेही वाटू लागले आहे.

‘कर्नाटकचा उत्तर प्रदेश’ म्हणजे नेमके काय? तर उत्तर प्रदेशात कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळण्याची कोणाही जाणकाराला वा चाचणीकर्त्याला खात्री वाटत नव्हती. पण, प्रत्यक्षात निकाल लागले, तेव्हा भाजपने बहुमताच्याही पुढे जाऊन ८० टक्के जागा जिंकलेल्या होत्या. चाचणीकर्त्यांचे अंदाज इतके कशाला फसले? दुसरीकडे एक्झिट पोल अनेकांचे यशस्वी का होतात? असे प्रश्न सामान्य माणसाला पडत असतात. उत्तर प्रदेशात अनेक फेर्‍यांत मतदान झाले. त्यात अखेरच्या दोन फेर्‍या बाकी होत्या, तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीमध्ये तीन दिवसांचा मुक्काम ठोकला होता, तर बहुतांश राजकीय अभ्यासकांनी भाजपच्या पराभवाची भाकिते केली होती. साहजिकच त्याचेच प्रतिबिंब मतचाचण्यांत पडले. एका मतचाचणीने काठावरचे बहुमत भाजपला देऊ केले होते आणि एका एक्झिट पोलमध्ये भाजपने पावणेतीनशे इतकी मजल मारली होती. पण, प्रत्यक्षात निकाल लागले, तेव्हा भाजप ४०३ पैकी ३२५ जागा जिंकून गेला. कर्नाटकात नेमकी तशीच परिस्थिती उद्भवली आहे. मोदींनी अखेरच्या आठवड्यात प्रचारात उडी घेतली आणि त्याकडेही मोदी भयभीत असल्याच्याच नजरेतून बघितले जात आहे. प्रत्येक चाचणीने त्रिशंकू विधानसभेचे भाकित केले आहे. पण, दोन दिवस आधी ‘टाईम्स नाऊ’ वाहिनीने एक झटपट चाचणी घेतली आणि तिचे आकडे थक्क करणारे आहेत. भाजपला ५७ टक्के, तर काँग्रेसला २८ आणि जनता दलाला १२ टक्के अशी मतांची टक्केवारी दिलेली आहे. त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येणार नाही. पण, अखेरच्या पर्वात मोदींनी जो वादळी प्रचार केला, त्याचा परिणाम जनमानसावर होताना दिसलेला आहे. बाकी सगळ्याच चाचण्या मोदी प्रचारात उतरण्यापूर्वीच्या आहेत. तिथेच सगळी गडबड होण्याची दाट शक्यता आहे. इथे कर्नाटकातही भाजप इतकी मोठी मजल मारून जाऊ शकतो काय?

योगायोग असा आहे की, उत्तर प्रदेश प्रमाणेच कर्नाटकातही तिरंगी लढत आहे. या तिरंगी लढतीमध्ये देवेगौडांचा पक्ष तिसरा आहे. उत्तर प्रदेशात अखिलेशचा समाजवादी पक्ष सत्तेत व मायावती त्याच्याशी तुल्यबळ असा पक्ष होता. पण, विधानसभेच्या लढतीमध्ये समाजवादी व भाजप अशा लढतीमध्ये मायावतींचा बसपा चिरडला गेला व जमिनदोस्त होऊन गेला. ‘मोदी’ नावाच्या वादळासमोर अखिलेशचा समाजवादी पक्ष पालापाचोळा होऊन गेला, तर त्याच्याच कुबड्या घेऊन लढणार्‍या काँग्रेसला आपल्या मुठभर जागाही टिकवता आल्या नाहीत. कर्नाटकात नेमकी तशीच स्थिती आहे. काँग्रेस सत्तेत आहे आणि भाजपशी त्याचे दोन हात चालू आहेत. त्यात जनता दलाचा बसपा झाला तर? म्हणजे आजवर धरून ठेवलेली २०-२२ टक्के मतेही देवेगौडांना टिकवता आली नाहीत तर? खरेच कर्नाटकात मोदीलाट घोंगावत असेल, तर त्यामध्ये काँग्रेसच्या सिद्धरामैय्या सरकारला टिकून राहाता येणार नाही. पण, काँग्रेसची धुळधाण होताना जनता दलाचा बोजवारा उडून जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात त्रिशंकू विधानसभेची प्रतिक्षा चालू असताना, सपा-बसपा एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून वंचित ठेवतील काय, अशी चर्चा रंगलेली होती. पण, निकालानंतर तशी काही गरज राहिली नाही. मायावती तर इतक्या नामोहरम झाल्या की, त्यांना राज्यसभेत जिंकण्याइतकेही आमदार मिळू शकले नाहीत. आताही कर्नाटकात देवेगौडा त्याच जागी आहेत किंवा तशाच परिस्थितीत आहेत. त्यांना स्वबळावर बहुमतापर्यंत जाणे शक्य नाही. साहजिकच त्यांचा मतदार वेगळा विचार करू शकतो आणि काँग्रेस वा भाजपकडे झुकू शकतो. तसे झाले तर जनता दलाचा पुरता बोर्‍या वाजल्याशिवाय राहाणार नाही. या शक्यतेला ‘टाईम्स नाऊ’ची झटपट चाचणी दुजोरा देताना दिसते आहे. या चाचणीने जिंकणार्‍या जागांचे आकडे दिलेले नाहीत, तर मतांची टक्केवारी सांगितली आहे.

मतदानापूर्वी व मोदींच्या प्रचाराची अखेर होत असताना घेतलेल्या या झटपट चाचणीने काहीशी उत्तर प्रदेशची झलक दाखवली आहे. मोजक्याच मतदारांशी फोनवरून प्रतिसाद घेतलेल्या या चाचणीने भाजपला ५७ टक्के मतदान होण्याची शक्यता वर्तवली आहे, तर काँग्रेस २८ व जनता दलाला १२ टक्के मते दाखवली आहेत. खरेच इतका मोठा प्रतिसाद मोदींच्या प्रचाराला मिळाला, तर भाजप २२४ पैकी १५० ते १८० जागा जिंकू शकेल आणि तसे झाल्यास इतरांसाठी केवळ ५०-७५ जागा शिल्लक उरतात. हे अगदीच अशक्य नाही. कारण, उत्तरप्रदेश त्यापेक्षाही मोठे बहुमत देऊन गेला आहे. अवघे ५० टक्के भाजपला मते मिळाली तरी भाजप दीडशे जागा मिळवू शकेल. पण, भाजप इतके मोठे यश मिळवताना काँग्रेसच्या फक्त जागा कमी होणार नाहीत वा सत्ताच गमावणार नाही. त्यापेक्षा मोठा फटका मायावतींप्रमाणे देवेगौडांना बसण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या वेळी त्यांच्याच पक्षाला मोठा फटका बसला होता आणि आठ-दहा टक्के मते त्यांनी गमावलेली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता होऊ घातली आहे काय? तसे खरोखर झाले, तर लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांनी काँग्रेस सोबत जावे किंवा नाही, असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. कारण, मोदी विरोधाच्या या राजकारणाचा मोठा फटका प्रादेशिक पक्षांनाच बसत असल्याचे पुन्हा सिद्ध होईलच. प्रादेशिक पक्षांच्या मरणातून काँग्रेसला संजीवनी मिळत असल्याचेही सिद्ध होणार आहे. ‘टाईम्स नाऊ’ची ताजी झटपट चाचणी म्हणूनच एका राज्यातील निकालापुरती महत्त्वाची नसून, देशात मोदी विरोधाची जी आघाडी उभी राहू बघत आहे, त्या संकल्पनेलाच धक्का देणारी आहे. ५७ टक्के ही प्रचंड आकडेवारी आहे. पण, ती ४७ टक्के इतकी निघाली तरी कर्नाटकचा उत्तर प्रदेश होऊन जाईल, यात शंका नाही. पण, तसे निकाल विरोधी राजकारणाचा व समजुतींचा पायाच उखडून टाकणारे ठरतील.




- भाऊ तोरसेकर
@@AUTHORINFO_V1@@