मुंबई : शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ नये ही सरकारची भूमिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून निर्णय घेण्यास प्राधान्य दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या शेतकऱ्यांप्रती संवेदनशील भूमिकेबद्दल काही गावांतील शेतकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांनी राजगुरुनगर-खेडमधील निमगाव, कणेरसर, दावडी, केंदूर या चार गावांशी निगडीत विशेष आर्थिक क्षेत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला, तसेच या जमिनींचे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना हस्तांतरण करण्यासाठीचे शुल्कही माफ केले होते. यासाठी शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले. दरम्यान, या सेझमुळे शेतकऱ्यांवर अन्याय आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे या विचाराने सेझ रद्द केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच शासनाने नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य दिले आहे. जमिनी अधिग्रहित करताना अधिकाधिक मोबदला दिला पाहिजे. रखडलेले पुनर्वसन नीट व्हावे याबाबत प्रयत्न केले आहेत. ज्यांच्या भरवश्यावर राज्याचा डोलारा उभा आहे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये अशीच शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“सेझ रद्द करून आणि त्यानंतर जमीन हस्तांतरण शुल्क माफ करून मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांना न्याय देणारी आणि रास्त भूमिका घेतली आहे. शासनाने यात सकारात्मक असा चांगला निर्णय घेतला आहे.राजू शेट्टी, खासदार”