पाकिस्तानच्या नागरिकाला थरूर यांनी दाखवला आरसा
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हे नेहमीच आपल्या सोशल मिडीयावरील वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. राजकीय तसेच सामाजिक दृष्ट्या संवेदनशील अशा अनेक मुद्द्यांवर थरूर हे नेहमी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून भाष्य करत असतात, आता देखील त्यांच्या अशाच प्रकारच्या एका ट्वीटमुळे थरूर हे चर्चेत आले आहेत. हे ट्वीट त्यांनी पाकिस्तानमधील एका नागरिकाला उद्देशून केले असून अगोदर दहशतवाद्यांना आवरा आणि मग भारताबरोबर चर्चेसाठी या असा अप्रत्यक्ष सल्ला त्यांनी आपल्या ट्वीटमधून दिला आहे. त्यामुळे थरूर यांचे हे ट्वीट सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
नुकत्याच काही वेळापूर्वी थरूर यांनी दोन ट्वीट केले असून यामध्ये त्यांनी एका पाकिस्तानी व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. थरूर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे कि, एका पाकिस्तांनी मित्राने मला कोरियामध्ये सुरु असलेल्या घटनेविषयी सांगितले, सध्या कोरियामध्ये सुरु असलेली घटना पहिली, त्यावर विचार केल्यावर असे जाणवले की, आपण कोरियन देशांना काही मदत तर करू शकत नाही, पण या घटनेची पुनरावृत्ती ही वाघा बॉर्डर मात्र नक्की होऊ शकते.
यावर उत्तर म्हणून थरूर यांनी म्हटले आहे कि, कारगिलचे युद्ध झाल्यानंतर देखील भारताने १९९९ मध्ये लाहोर करार केला. यानंतर २००३ ते ०८ च्या दरम्यान पुन्हा चर्चा सुरु केली, पण त्यानंतर २६/११ चा हल्ला झाला. यानंतर २०१५ मध्ये मोदींनी भेट दिली. पण त्यानंतर पठाणकोटचा हल्ला झाला. पाकिस्तान जो पर्यत आपले लष्कर आणि जिहादींचा वापर करत राहील, तो पर्यंत किती भेटी आणि चर्चा झाल्या तरी देखील त्या व्यर्थच ठरणार आहेत. पाकिस्तानातील अनेक जणांमध्ये हे थांबविण्याची क्षमता आहे. पण सध्या तरी हे एका अपुऱ्या स्वप्नासारखेच आहे,अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.