१३ रोजी सकाळी ८ वाजता शिवतिर्थमैदानातून सुरुवात
जळगाव :
येथील किशोर पाटील, संध्या पाटील आणि वास्तव पाटील हे कुटुंब रविवार १३ मे रोजी ६५ दिवसांच्या भारतभ्रमंतीवर निघणार आहे. शहरातील शिवतिर्थ मैदान येथून सकाळी ८ वाजता या भ्रमंतीवर निघणार असल्याची माहिती पद्मालय येथे पत्रपरिषदमध्ये पाटील कुटुंबाने दिली.
शहरातील डी.जे.व्यावसायीक किशोर पाटील यांनी सांगितले की, आमच्या लग्नाला १९ वर्षे झाली. पहिल्यापासून आम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी मोटारसायकलीने फिरुन तेथील तिर्थस्थळांना भेटी देवून सौंदर्य पाहण्याची आवड निर्माण झाली होती. आतापर्यंत आम्ही साडेतीन शक्तीपीठ पाच दिवसात मोटारसायकलने पूर्ण केले होते. या वेळेस काहीतरी वेगळे करण्याची जिद्द आमच्या मनामध्ये निर्माण झाली. म्हणून आम्ही संपूर्ण भारतभ्रमंती करुन भारताच्या बॉर्डर चारचाकी या गाडीने भ्रमण करण्याचा निर्णय घेतला. भारतभ्रमंतीसाठी आम्हाला १८ दिवसाचा कालावधी लागणार असून यासाठी नियोजन केले असल्याचेही किशोर पाटील यांनी सांगितले. या भ्रमंतीसाठी मित्रांनी आर्थिक व्यवस्था करुन दिली. आमच्या घरच्यांनीही भारतभ्रमंतीला आम्हाला पूर्ण संमती दिली असून आम्ही सुखरुप परत घरी येवू असा आत्मविश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला डॉ.उल्हासराव पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे पीआरओ राहुल कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
भारतातील एकमेव भारत मातेच्या मंदिरालाही भेट
१३ रोजी सकाळी ८ वाजता शिवतिर्थ मैदानावरुन प्रारंभ केल्यानंतर नाशिक वणीगड येथे सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेवून पालीच्या गणपती मंदिरावरुन भारतभ्रमंतीचा श्रीगणेशा करणार आहे. कोकणमार्गे पणजी, कोची, उडीपीनंतर रामेश्वरमला पोहोचणार आहे. रामेश्वरनंतर तिरुपती, जगन्नाथपूरी, झारखंड, उत्तरप्रदेश, कामाख्या माता मंदिराला भेट. नंतर गुवाहाटी, पूर्वांचल, इंफाळ, सिडीमुही, बिहारमधील एकमेव असलेले भारत मातेच्या मंदिराही भेट देणार आहे. पुढे गंगोत्री, हरीद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, मथुरा, आग्रा, दिल्ली, श्रीनगर, लेह, लद्दाक या ठिकाणी निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी जास्त दिवस घालवणार आहे. नंतर श्रीनगरमार्गे पंजाब, गोल्डन मंदिर, वाघा बॉर्डरला भेट. पुढे राजस्थान, कच, गुजरात, सोमनाथ सोरटी, अहमदाबाद, बढोदामार्गे पुन्हा पालीच्या गणपती मंदिरावर भारतभ्रमंतीचा समारोप होणार आहे.
लिमका बुकमध्ये रेकॉर्ड होणार
किशोर पाटील (वय ४१), ऍड.संध्या पाटील (वय ३७), वास्तव पाटील (वय १४) या कुटुंबाने ६५ दिवसांच्या प्रवासात पाटील कुटुंब ज्या ज्या राज्यातील माती, पाणी घेवून येणार आहे. या भारतभ्रमंतीमध्ये ते ‘झाडे लावा’, ‘भारत मेरा देश है’, ‘जीवन जगण्यासाठी आवश्यक श्वास महत्वाचा’ असल्याचे महत्व ते या भारतम्रंतीमध्ये प्रत्येक राज्यातील लोकांना पटवून सांगणार आहे. भारतभ्रमंतीनंतर जळगावमध्ये कार्यक्रम घेवून त्या त्या राज्यातील माती एकत्र करुन प्रत्येक राज्यातील माती वेगळी करुन पहा होते का? ‘हम सब एक है’ असा संदेश या माध्यमातून ते देणार असल्याचेही किशोर पाटील यांनी सांगितले.