यवतमाळ : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाकडून आयोजित करण्यात आलेल्या 'सामाजिक समता सप्ताहा'चे काल पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे या समता सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. येत्या १४ तारखेपर्यंत या मार्फत जिल्ह्यात अनेक उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
'डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीय समाजामध्ये स्वातंत्र, समता व बंधुत्वाची भावना पोहोचविण्याचे महान कार्य केले आहे. सध्या शासनाने देखील 'सबका साथ, सबका विकास' या मंत्रासह समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध योजनांची निर्मिती केली आहे. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तळागाळातील दुर्बल घटकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गांभिर्याने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच विद्यार्थी हा आपल्या देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे गुण युवकांनी घेऊन राष्ट्रनिर्मितीमध्ये सहकार्य करावे. प्रत्येकाने आपली सामाजिक जाणीव लक्षात घेवून कार्य केल्यास डॉ.कलाम साहेबांचे महासत्येचे स्वप्न नक्कीच वास्तव्यास येईल, अशी आशा देखील येरावार यांनी यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या गौरव तसेच दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेंतर्गत जमीन वाटपाचे आदेश पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा कांचन चौधरी आणि प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकात जाजू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबाबत विचार व्यक्त केले.