"सरदार पोस्ट" : असीम शौर्याची गाथा
ही "शौर्यगाथा" आहे गुजरातच्या कच्छ येथील रणभूमीची. १९६५ मध्ये भारत- पाक युद्धादरम्यान केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका तुकडीला कच्छच्या रणभूमीवर तैनात करण्यात आले होते. पाकिस्तानने भारतात घुसखोरी करण्याच्या हेतूने "कंजरकोट" आणि "डींग" येथे आपले सैन्य दल तैनात केले. या सैन्यदलाला थांबविण्यासाठी भारताच्या केंद्रीय राखीव पोलिस दल म्हणजेच सीआरपीएफने कंजरकोट जवळ "सरदार पोस्ट" आणि डींग जवळ "टाक पोस्ट" अशा दोन तुकड्या तैानात केल्या.
९ एप्रिल १९६५ रोजी पहाटे साधारण ३.३० वाजता पाकिस्तानच्या सैन्याच्या एका तुकडीने सरदार पोस्टच्या दिशेने कूच केले. पाकिस्तानी सैन्याच्या या तुकडीजवळ मोठ्या संख्येत सैनिक आणि प्रचंड प्रमाणात शस्त्रसाठा होता. सरदारपोस्टच्या दिशेने सैनिक येत असताना हवलदार रणजीत सिंग यांनी बघितले आणि आपल्या सहकारी पोलिस सैनिकांना सावध केले. यानंतर मोठे युद्ध सुरु झाले. सर्व पोलिस सैनिकांनी मोठ्या बहादुरीने मोर्चे सांभाळले.
सैनिकांकडे शस्त्रसाठा कमी होता, पाकिस्तानी सैन्याला पराजित करण्यासाठी टाकपोस्टवरील टेहळणी मचाण देखील नष्ट करण्यात आली. कॉन्स्टेबल शिवराम यांनी ६०० यार्डांवरुन होत असणाऱ्या मॉर्टार फायरिंग बद्दल टाक पोस्टला सावध केले. पाकिस्तानी सैन्याला नेस्तनाबूत करण्यासाठी एक विशेष युक्ती करण्यात आली. त्वरित गोळीबार थांबवण्यात आला. पाकिस्तानला भासवण्यात आले की सर्व सैनिकांचा मृत्यु झाला आहे. पाकिस्तानी सैन्य जवळ येताच पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु करण्यात आला. पाकिस्तानी सैन्य बावचळून गेले. घाबरून पळायला लागले.
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या असीम शौर्यामुळे पाकिस्तानी सैन्यातील ३४ जवानांना ठार करण्यात त्यांना यश आले तर ४ जवानांना जीवंत पकडण्यात आले. पहाटे तीन वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत (भारतीय सेनेच्या जवानांच्या अनेक तुकड्या सरदार पोस्टवर पोहोचे पर्यंत) सीआरपीएफच्या जवानांनी पाकिस्तानी सैन्याला झुंझ दिली.
आपल्या असीम शौर्य आणि बहादुरीच्या जोरावर त्यांनी पाकिस्तानच्या भल्या मोठ्या फौजेला पराजित केले.
या युद्धात नायक किशोर सिंह, कॉन्स्टेबल शमशेर सिंह, कॉन्स्टेबल ज्ञान सिंह, कॉन्सटेबल सिद्धवीर प्रधान, कॉन्स्टेबल किशन सिंह आणि लान्स नायक गणपतराम शत्रुशी लढता लढता शहीद झाले. या शौर्यगाथेचे प्रणेते पोलिस अधिक्षक डी.एस पॉल, सुबेदार काशीराम सुब्बा, हेड कॉन्स्टेबल रणजीत सिंह, कॉन्स्टेबल विश्वनाथ सिंह, कॉन्स्टेबल माखनलाल दत्त आणि कॉन्स्टेबल शिवराम यांना राष्ट्रपती वीरता पुरस्काराने गौरविण्यात आले.