अमित शाह यांचे विरोधकांना खुले आव्हान
मुंबई : सिंचन घोटाळा व त्यासह अनेक घोटाळ्यांमधील घोटाळेबाजांवर आम्हाला कारवाई करायचीच आहे. मात्र, ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच करायची आहे. ती प्रक्रिया सध्या सुरू आहे. या घोटाळेबाजांवर आम्ही निश्चितच कारवाई करू, निवडणूक तर जवळ येऊ द्या, असे सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह यांनी विरोधी पक्षांना सरळसरळ आव्हान दिले.
शुक्रवारी भाजपने आयोजित केलेल्या प्रदेश महामेळाव्याला उपस्थित राहिल्यानंतर बीकेसीतील हॉटेल सूफीटेल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमित शाह बोलत होते. ते म्हणाले की, आज साजरा होत असलेला भाजपचा स्थापना दिन ही आम्हा पक्ष कार्यकर्त्यांसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. स्थापनेनंतर अवघ्या ३८ वर्षांतच भाजप देशातील सर्वात आघाडीचा राजकीय पक्ष बनला आहे. हा पक्ष घराणेशाहीवर चालणारा पक्ष नसून कार्यकर्ते आणि तत्वावर चालणारा पक्ष आहे. एक काळ असा होता की जेव्हा आमच्या पक्षाचे केवळ २ खासदार होते. तेव्हा त्या परिस्थितीतही आम्ही एकत्र होतो, आमच्यात फूट नव्हती. आम्ही अविरतपणे वाटचाल केली आणि आज आमचे ११ कोटी सदस्य आहेत, २० हून अधिक राज्यांत भाजपचे सरकार आहे, आमचे १६०० हून अधिक आमदार आहेत, असे त्यांनी नमूद केले. तसेच, प्रामाणिक, पारदर्शी, निर्णायक, संवेदनशील आणि देशभक्त सरकार कसे असावे याचे नरेंद्र मोदी सरकार हे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले. या सरकारने राबवलेल्या योजना व धोरणांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दि. १४ एप्रिल ते ५ मे या काळात देशातील २० हजार गावांमध्ये भाजपचे नेते व कार्यकर्ते जाणार असल्याची घोषणाही अमित शाह यांनी यावेळी केली.
अमित शाह उवाच..
* ११ एप्रिल : महात्मा फुलेंचा जन्मदिन भाजप देशभरात साजरा करणार
* देश तोडण्यासाठी प्रयत्नशील शक्तींविरोधात लोकशाही मार्गाने करणार सकारात्मक विचारांचा जागर
* १३ एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दिल्लीतील स्मारकाचे लोकार्पण होणार
* नरेंद्र मोदी हे जगातील सर्वांत लोकप्रिय नेता
* पक्षात नाराजी नाही, पण तसे वातावरण बनवले जात आहे
* आजचे पेट्रोलचे दर युपीएच्या काळापेक्षा स्वस्तच
* बाबासाहेबांना संसदेत जाण्यापासून, 'भारतरत्न' देण्यापासून काँग्रेसनेच रोखले
* लिंगायत धर्माला मान्यता हे कर्नाटक राज्य सरकारचे 'चुनावी नाटक'
* काश्मीरात गेल्या ४ वर्षांत आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक अतिरेकी मारले गेले
* २०१९ ची निवडणूक भाजप आधीपेक्षा अधिक मताधिक्याने जिंकणार