प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांचा विश्वास
मुंबई : ६ एप्रिल हा भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे. स्थापना दिवसासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जवळपास तीन लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या मेळाव्यानंतर सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागून पक्षाला यश मिळवून देतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केला.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आ. आशिष शेलार, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड, महिला मोर्चा अध्यक्ष ॲड. माधवी नाईक, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते केशव उपाध्ये, अतुल शाह व गणेश हाके उपस्थित होते.
१९८० साली मुंबईत भाजपची वाटचाल सुरु झाली. डिसेंबर २०१३ मध्ये याच परिसरात भाजपाची विराट महागर्जना रॅली झाली आणि परिवर्तन घडले. यावेळीही भाजपच्या महामेळाव्यासाठी राज्यभरातून पक्षाचे लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या मेळाव्यानंतर कार्यकर्ते नव्या उमेदीने कामाला लागतील व पक्षाला यश मिळवून असे दानवे म्हणाले. दरम्यान, यावेळी भाजपचे विराट स्वरूप पहायला मिळणार असून अनेक ठिकाणांहून लाखो कार्यकर्ते मुंबईत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महिला भगिनींना थांबण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली असून कुर्ला, वांद्रे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी स्टॉल उभारण्यात येणार आहेत. तसेच तेथून कार्यकर्त्यांना सभास्थळी ने-आण करण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आल्याचे दानवे म्हणाले.
बाईक रॅली काढून अध्यक्षांचे स्वागत
महामेळाव्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आज सायंकाळी मुंबईत येणार आहेत. विमानतळापासून त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत युवामोर्चाचे कार्यकर्ते बाईक रॅली काढून त्यांचे स्वागत करणार करणार असल्याची माहिती अॅड. आ. आशिष शेलार यांनी दिली. शुक्रवारी महामेळाव्यास संबोधित केल्यानंतर अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक पार पडणार असल्याचे ते म्हणाले.