अतिक्रमीत जमिनी नियमानुकुल करण्याचा राज्य शासनाचा निर्णय
चंद्रपूर : भारत – पाकिस्तान फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातुन आलेल्या निर्वासितांना देण्यात आलेल्या जमिनींच्या धारणाधिकाराचे सर्वेक्षण करून पुनर्विलोकन करण्याच्या प्रक्रियेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सिंधी समाजबांधवांच्या वसाहतींमध्ये भरपाई संकोष मालमत्तेमधून दिलेल्या अथवा अशा मालमत्तेवरील अतिक्रमण नियमानुकुल करून वर्ग-ब सत्ता प्रकाराने असे भुखंड दिल्याचे आढळल्यास पुनर्विलोकन करून अशा निवासी मिळकतीला वर्ग-अ नमुद करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
सिंधी समाज बांधवांच्या हिताचा सदर निर्णय घेतल्याबद्दल सिंधी समाज बांधवांच्या एका शिष्टमंडळाने चंद्रपूरात सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. तात्पुरत्या पट्ट्यावर दिलेल्या जमिनी मालकी हक्काने देणे तसेच त्यांना भाडे पट्ट्याने दिलेल्या जमिनी सुध्दा मालकी हक्काने देणे या सिंधी समाज बांधवांच्या मागण्यांचा सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या अनेक वर्षापासुन सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. विधानसभा सदस्य म्हणून सुध्दा त्यांनी विधानसभागृहाच्या माध्यमातुन या विषयाचा सतत पाठपुरावा केला आहे. ही प्रलंबित मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पुर्णत्वास आल्यामुळे सिंधी समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.