यावल :
भुसावळ ते यावल प्रवासा दरम्यान ऍपेरिक्षात प्रवाशांची विसरलेली बॅग आणि थैली रिक्षाचालक अट्रावल ता. यावल येथील रहिवाशी बाळू कोळी यांनी परत केली आणि प्रामाणिकपणा अजूनही कायम असल्याचे दाखवून दिले.
बाळू कोळी हे यावल ते भुसावळ दरम्यान ऍपेरिक्षा चालवतात. भुसावळ येथून यावल येथे प्रवास करीत असलेल्या दोघा प्रवाशांची बॅग रिक्षात राहिल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यात चेक बुकवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता एका भांडे विक्रेत्याच्या दुकानात त्या प्रवाशांची थैली व बॅग प्रामाणिक प्रमाणे परत केल्याने रिक्षाचालकाचे कौतुक होत आहे.
अट्रावल ता. यावल येथील बाळू बळीराम कोळी हा त्याची रिक्षा क्र. एम.एच. १९.५७३१ने भुसावळहून यावल येथे प्रवासी घेऊन आला. त्यात मधुकर शंकर तायडे रा. नागपूर व एक अन्य व्यक्ती हे यावल येथे अंबिका मेटल या भांड्यांच्या दुकानात मुलीच्या लग्नाचे शिल्लक राहिलेले आहेराचे भांडे परत करण्यासाठी आले होते. त्यांची बॅग बाळू कोळी यांच्या रिक्षामध्ये राहिली प्रवासी उतरल्यानंतर बॅग राहिल्याचे कोळी यांच्या लक्षात आले, त्यांनी पिशवी उघडुन पाहिली त्यात स्टेट बँकेंचे मधुकर तायडे यांचे चेक बुक होते त्यात त्यांचा मोबाईल क्रमांक असल्याने त्यांच्याशी संपर्क साधला मधुकर तायडे हे अंबिका मेटल यावल यांचे मालक विजय रमेश कासार यांच्याशी गप्पा गोष्टी करत होते बाळू कोळीचा फोन त्यांना आल्याने त्यांनी दुकानात येऊन ती थैली त्यांच्या स्वाधीन केली. थैली उघडली असता त्यात चेकबुक व पंचवीस हजार रुपये रोख व काही सुटे पैसै होते, ते त्यांनी तायडे यांच्या स्वाधीन केले.
पाय धरले, आनंदाने रडू कोसळले...
मधुकर यांनी बाळू कोळीचे पाय धरले, आनंदातिशयाने त्यांना रडू कोसळले, त्यांनी दोन हजार रुपये रोख बक्षीस देण्यासाठी बॅगेतून पैसे काढले मात्र बाळू कोळी यांनी ते घेण्यास विनम्र नकारही दिला. रिक्षाचालकाच्या या प्रामाणिकपणामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.