नवी दिल्ली : ‘रामरत्ना’ समूहाचे अध्यक्ष रामेश्वरालाल काबरा यांना राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नुकतेच ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काबरा यांचा जन्म१४ ऑक्टोबर १९३३ रोजी बंगालमधील शेरपूर येथे झाला. १९४७ च्या भारत-पाकिस्तान फाळणीनंतर ते नेपाळमधील विराटनगर येथे स्थायिक झाले. १९६६ मध्ये मुंबईत येऊन त्यांनी ट्रेडिंगचा व्यवसाय सुरु करुन निर्यात आणि इंडस्ट्रीजच्या दिशेने अग्रेसर होत वाइंडिंग वायर्स, केबल्स, ऑटोमेटेड कार पार्किंग, कॉपर आणि इलेक्ट्रिकल्स उत्पादनांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. आज त्यांनी या व्यवसायांमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्वाबद्दल भारत सरकारने त्यांना यंदा ‘पद्मश्री’ हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवले आहे.
आज वयाच्या ८४ व्या वर्षीही वनवासी समाजाच्या विकासासाठी महिन्यातील १५ दिवस ते दुर्गमभागातील वनवासी क्षेत्रात प्रवास करत असतात. ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.