दोन दिवसांपासून दिल्लीतल्या एका महत्त्वाच्या बातमीने खळबळ माजविली आहे. आता हे पेल्यातील वादळ की नव्या बदलांची नांदी ते येणारा काळच ठरवेल. परंतु, जे सुरू झाले आहे ते नक्कीच दखलपात्र आहे. नवीन कुमार या २०१५ साली आयआयटीतून पास झालेल्या दलित युवकाने त्याच्यासारख्याच ५० आयआयटी शिक्षित तरुणांना सोबत घेऊन पक्ष स्थापन करण्याची कवायत सुरू केली आहे. निवडणूक आयोगाकडे सध्या या पक्षाची मान्यता देण्याबाबतचा अर्ज दाखल केला आहे. आपल्यासोबत ५० आयआयटीयन्सनी आपल्या कामाचा व नोकरीचा त्याग केला असून पुढील काळात पूर्ण वेळ राजकारण करणार असल्याची माहिती नवीन कुमार यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या पक्षाचा अजेंडा पहिल्या दिवशीच जाहीर केला आहे. शिक्षण व रोजगाराच्या नाकारलेल्या संधींसाठी संघर्ष, खाजगी क्षेत्र, न्यायालये व नोकरीतील बढतीसाठी आरक्षण, महिलांना सर्वच क्षेत्रांत श्रेणीसह आरक्षण, शिक्षण, आरोग्य, कृषी, रोजगार, पर्यावरण, सामाजिक न्यायव्यवस्थांमध्ये सुधार अशा या पक्षाच्या मागण्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि ज्ञानार्जनाच्या भावनेचा विकास करण्याची जबाबदारी आपल्या पक्षाची असल्याचे नवीन कुमार सांगतात. खाजगी क्षेत्रातील नोकरीतील बढती व न्यायालयांमध्येदेखील आरक्षण हा मुद्दा सोडला, तर ‘बाप’च्या कुठल्याही मुद्द्यावर असहमत होण्यासारखी स्थिती नाही. रोजगाराची गरज हा मुख्य मुद्दा मानला तर तो राष्ट्रीय मुद्दाच आहे. देशातील तरुणांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, यात काही शंका नाही. मात्र, त्या केवळ दलितांनाच नाकारल्या जात असल्याचा कांगावा योग्य नाही.
नवीन कुमार यांच्या पक्षाकडे ‘अजेंडा’ चांगला आहे. संघटन कौशल्य आणि सकारात्मक कार्यक्रम असेल तर हा पक्ष वाढेल, यात शंका नाही. कारण, दलित युवकांना आज मोठ्या प्रमाणावर नेतृत्वाची गरज भासत आहे. सुशिक्षित दलित तरुणांना त्यासाठी कोणतेही व्यासपीठ विश्वसनीय वाटत नाही. त्याचे मुख्य कारण स्वत:ला दलित मतांचे ठेकेदार म्हणविणारे दलित नेतेच आहेत. सुरुवातीच्या काळात थोडाफार संघर्ष केल्यानंतर ही मंडळी जी काही सत्तेच्या कच्छपी लागली ती कायम आहे. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा,’ हा बाबासाहेबांच्या जीवनाचा मूलमंत्र मात्र ‘सत्तेसाठी स्वत:ला विका, समाजाला संघटित होऊ देऊ नका आणि संघर्ष करण्यापेक्षा सत्तेत कसे सहभागी होता होईल याकडेच पाहा,’ असा तथाकथित दलित नेतृत्वाचा शिरस्ता झाला आहे. दलित समाजात दोन प्रकारचे प्रवाह आज प्रवाहित आहेत. एक आहे, जो आजही बर्याचशा संधींपासून वंचित आहे आणि दुसरा आहे, ज्याला शिक्षणाच्या संधी मिळाल्या आहेत. शिक्षणातून आलेली समज या दुसर्या वर्गाला आज जे काही चालले आहे ते पाहिल्यावर अस्वस्थ करते. या दोन्ही काठांमधून दलित समाजाचा प्रवाह वाहत आहे. दलित समाजातील सुशिक्षितांकडे उर्वरित समाज मोठ्या आशेने पाहातो, मात्र अशा वर्गाकडून राजकीय ध्रुवीकरणाची प्रक्रिया आजतागायत घडवून आलेली नाही. नवीन कुमारच्या पक्षाकडून ती घडून आली तर या राजकारणाला एक निराळीच कलाटणी मिळू शकते. बाबासाहेबांचे नाव घेऊन आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी राजकारण केले, त्या सगळ्यांनी आपले अस्तित्व निर्माण झाल्यावर समाजाच्या प्रश्नावर संघर्ष करणे सोडून दिले.