जळगाव :
जलयुक्त शिवार अभियांनातर्गत गावांची निवड करताना तयार केलेल्या पाण्याच्या ताळेबंदानुसार दुसर्या टप्प्यातील (२०१६-१७) जिल्ह्यातील सर्व २२२ गावे जलयुक्त झाली आहे. त्यात जामनेर तालुक्यातील सर्वाधिक २६ गावे, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा तालुक्यातील प्रत्येकी २० गावांचा समावेश आहे. तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्याला २ कोटी १६
लाख रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे.
जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक मंगळवारी,२४ रोजी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
बैठकीला अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप वनसंरक्षक दिगंबर पगार, यावल विभागाचे उप वनसंरक्षक संजय दहिवले, जि.प.चे डेप्युटी सीईओ संजय मस्कर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र पाटील, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार, जि.प.जलसंधारणचे नाईक, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उपविभागीय कृषी अधिकारी नारायणराव देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) बी.ए.बोटे आदी अधिकारी होते.
४ हजार ८४३ कामे पूर्ण
दुसर्या टप्प्यात जिल्ह्यातील २२२ गावांची निवड झाली होती. विविध यंत्रणामार्फत ४ हजार ८५६ कामांचे नियोजन केले होते. त्यापैकी ४ हजार ८४३ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर आतापर्यंत १२४ कोटी ७६ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. उर्वरित कामे वन विभागाच्या परवानगीअभावी प्रलंबित होती.