गडचिरोली : नक्षलवाद्यांविरोधात महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या तीन दिवसांनंतर देखील नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती सापडत आहेत. कारवाईच्या आजच्या तिसऱ्या दिवशी आणखी दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह महाराष्ट्र पोलिसांच्या हाती लागले असून यामुळे मूत नक्षलवाद्यांची संख्या ही ३९ वर जाऊन पोहचली आहे.
महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या इंद्रावती नदीमधून आज या दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. या दोन्ही मृतदेहांची ओळख अजून पटलेली नाही. परंतु त्यांच्या पोशाखावरून ते नक्षलवादी असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. तसेच भामरागड येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये हे नक्षलवादी देखील ठार झाल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे 'भामरागड कोबिंग ऑपरेशन'मधील मृत नक्षलवाद्यांची संख्या ३९ वर जाऊन पोहोचली आहे.
गेल्या रविवारी महाराष्ट्र पोलिसांनी भामरागडमधील तासगाव येथे नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली होती. या कारवाईमध्ये पोलिसांनी ४० हूनअधिक नक्षलवाद्यांना ठार केले होते. परंतु सुरुवातील फक्त १६ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानंतर सातत्यने तीन दिवस शोध घेतल्यानंतर आणखीन २३ मृतदेह पोलिसांना मिळाले.