नाशिक : मनपाने केलेल्या करवाढप्रश्नी पालकमंत्री, आयुक्त, पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. आपण नाशिकमध्ये आल्यावर याबाबत माहिती घेतली. पदाधिकारी आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा झाली. त्यात हा निर्णय झाला, असे ते म्हणाले.
नाशिक हा प्रगत आणि महत्त्वाचा जिल्हा आहे. पुढील महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असून त्यात नाशिकला मंत्रिपद देण्याबाबत प्राधान्याने विचार होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे यावेळी नाशिकचे चारही आमदार उपस्थित होते. शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, आ. डॉ. राहुल आहेर, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे यांच्याबरोबरच संघटन मंत्री किशोर काळकर, विजय चौधरी, भाजप प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, डॉ. बाळासाहेब आहेर, जिल्हा अध्यक्ष दादासाहेब जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
पक्षबांधणी करताना एक बूथ २४ युथ संकल्पना राबवून प्रत्येक पानाला एक कार्यकर्ता अशी योजना करून आगामी निवडणुकीत पक्ष संघटन काम करणार आहे. पक्षाला ४८ वर्षे पूर्ण झाल्याने नुकत्याच मुंबईत घेण्यात आलेल्या महामेळाव्यात ९१ हजार ४०० पैकी ८० हजार बुथप्रमुख उपस्थित होते, असे सांगून पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अतिशय बारीकसारीक गोष्टींचा विचार करण्यात आला असून प्रचारप्रमुख नेमून त्याद्वारे पक्षसंघटन वाढविण्यात येत आहे. पन्नास बूथप्रमुख आपल्या कार्यकर्त्यांसमवेत जनतेच्या संपर्कात कायम राहतील. त्यानुसार प्रश्न सोडविण्यात येतील, असेही दानवे यांनी सांगितले.