सचिनाख्यान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2018
Total Views |


तो एकोणीसाव्या शतकाचा शेवटचा कालखंड होता. संपुर्ण भारत मुलूख परकीय आक्रमकांद्वारे, विदेशी वेगवान गोलंदाज सरदारांच्या वेगवान गोलास्त्रामुळे, फिरकी मायावी अस्त्रामुळे भरडला जात होता. भारतीय मुलूखातील जनता असुरक्षेच्या, अपयशाच्या दहशतीत दिवस कुंठीत होती. भारतीय चेंडुफळीची देऊळे, राऊळे युद्धातील अपयशामुळे उध्वस्त होत होती. आशेचा किरण 'सनी' सूर्यही मावळला होता. अनेक वर्ष दुभती 'कपिला' गायही आता वृद्ध झाल्याकारणाने आता पुर्वीसारखी प्रसवत नव्हती.


किरमाणी गेल्याने मागे राहिलेल्या किर्र काळोखात शास्त्री आणि मोरे हे मराठा सरदार अधुन मधुन काजव्या प्रमाणे चमकायचे. वासरांच्या कळपात फार थोड्या लंगड्या गायीच शिल्लक होत्या. एकंदर संपुर्ण मुलुख युरोपीयन गोरे, आफ्रिका खंडातील काळे धिप्पाड दैत्यरूपी वॉल्श, अँम्ब्रोस सरदार वायव्येकडील कृर द्वेषी अक्रम खान हे यवन सरदार दूर सागरातील ऑस्ट्रेलिया बेटावरील लिली. इ. परकीय वेगवान आक्रमणांमुळे भरडुन निघत होता. त्या अपयशाच्या दहशतीच्या काळोखाला नष्ट करणे आता कोण्या देवालाच मानवी अवतार घेउन आल्यावरच शक्य होते.


''यदा यदा ही धर्मस्य
       ग्लानिर्भवतु भारत.... ''


ह्या वचनाची आठवण होउन सामान्य प्रजा ईश्वराचा धावा करू लागलीत!

''त्राही माम्! त्राही माम्''


संत देवीला आळवु लागलेत.
''दार उघड बये दार उघड...''

हे दुर्गे..

हे महिषासुरमर्दिनी.. दार उघड!!
हे सप्तश्रृंग निवासिनी!!

दृष्टांचा संहार होण्यासाठी..

स्वराज्य स्थापन होण्यासाठी दार उघड!!

आणि बयेनं दार उघडलं!

१९७३ सालचा वसंत ऋतु नुकताच संपला होता. ग्रीष्मास सुरूवात होत होती. आकाशातील रवी आपलं तेज प्रचंड वाढवत होता..धरणी तप्त झाली होती. वायु उष्ण होते. आणि २४ एप्रिलचा तो सुदीन उजाडला ! प्रात:काळापासुनच शुभ शकुन मिळत होते.

आणि


तिन्ही बाजुने सागराने वेढलेल्या मुंबापुरी परगण्यात दादर इलाख्यात श्री रमेश आणि रजनी तेंडुलकर या मराठी कुटुंबात एका दिव्य बाळाचा जन्म झाला!

पिताश्री रमेश तेंडुलकरांनी; तत्कालीन महान विख्यात संगीतकार, राजगायक श्री सचिन देव बर्मन यांच्या नावावरून आपल्या बाळाचे 'सचिन' हे नामकरण केले.


''सचिन जन्मला गं सखे सचिन जन्मला..''
घरतील स्त्रिया हर्षोन्मादाने गाउ लागल्या! अत्यंत आनंदात दिवस भरभर जात होते. कुरळे जावळे असलेला बाल सचिन आता रांगायला लागला होता. एक दिवस घरची मंडळी आपापल्या कामात बाहेर व्यस्त होती. दिवाणखाण्यातील जमिनीवर बाल सचिन रांगत होता आणि.. त्याक्षणी बाल सचिनचे लक्ष समोरील कोनाड्यात उभे ठेवलेल्या शस्त्राकडे गेले !!!!!

बाल सचिन रांगत कुतुहलापोटी त्या विलक्षण शस्त्राकडे रांगत गेले. ते जेष्ठ बंधुंचे 'फळी शस्त्र' होते. आंग्ल भाषेत त्या शस्त्राला 'बॅट' असे म्हणत !! बाल सचिनने त्या शस्त्राला स्पर्श केला! त्याक्षणी विजा कडाडु लागल्यात..वायु वेगाने वाहु लागला! धरणी क्षणभर थरथरली! आणि बाल सचिनला स्मरण झाले आपण कोण आहोत आपला जन्म कशासाठी झाला आहे! आतापर्यंत 'कोहम् कोहम्' म्हणणारा सचिन आता 'सोहम् सोहम्' म्हणु लागला!

स्वर्गस्थ यक्षादी देवगण ते दृश्य आकाशातून आनंदाने पाहु लागले... शुक्ल पक्षातील बालइंदु चंद्रकोरीप्रमाणे बाल सचिनही आता मोठे होत होते. ''ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा..'' हे त्रेतायुगातील दैत्यांचा वध करण्यासाठी दशरथाला म्हणणाऱ्या विश्वामित्रांप्रमाणे; एक दिवस श्री रमाकांत आचरेकर हे तत्कालीन चेंडु फळी विद्येचे, युद्धशास्त्राचे महान गुरूवर्य रमेश तेंडुलकरांना म्हणु लागले ''कनिष्ठ तुझा पुत्र मला देइ तेंडुलकरा.. ''


अशा प्रकारे बाल सचिनच्या जीवनातील एका अत्यंत महत्वाच्या पर्वास प्रारंभ झाला. बाल सचिनचा रमाकांत आचरेकरांच्या शिवाजी पार्कातील गुरूकुलात प्रवेश झाला. बाल सचिन दररोज करड्या शिस्तेच्या आचरेकर गुरूंकडुन युद्धाचे प्रशिक्षण घेऊ लागला. दररोज पहाटे उठणे, दौड मारणे, व्यायाम करणे आणि फळी शस्त्र चालवणे हाच दिनक्रम होता. एका यष्टीवर एक राजमुद्रा ठेऊन युद्धशास्त्र..फळी अस्त्र शस्त्र स्व संरक्षण, आक्रमण.. आंग्ल भाषेप्रमाणे हुक, पुल, कवर, स्ट्रेट ड्राइव्ह, स्केअर कट इत्यादी अस्त्र शस्त्र विद्या शिकु लागला.

फक्त फळी शस्त्रच नाही तर अचुक वेध घेणारे मायावी फिरकी, वेगवान गोलास्त्र टाकणे ही शिकला. प्रशिक्षणाची काही वर्षे गेलीत. हळुहळु बाल सचिन आता कुमार सचिन झाला होता. कुरळे केसांचा नाजुक कोवळी लव असलेला मिसरूड फुटलेला कमी शारिरीक उंची असलेला, कोमल स्वरांचा सचिन आता कुमार झाला होता. मैदानी युद्धातील क्षेत्ररक्षण, फलंदाजी, गोलंदाजी सर्व विद्या आत्मसात केली होती. त्याच काळात आपल्या 'विनोदवीर' मित्रासोबत मिळुन इतर गुरूकुलीन युद्ध स्पर्धेत एक जागतिक विक्रमही केला होता. दुसरीकडे त्याच काळात देशाची सैन्य भरती सुरू होती. आणि सचिनची सैन्यात निवड झाली. इतक्या लहान वयात सीमेवर देशासाठी खेळायला मिळणे हे कुमार सचिन आणि देशाचंही नशीब होतं. सचिन युद्धासाठी जाण्यास सज्ज झाला. माता रजनीने निरांजनाने पुत्राचे औक्षण केले. युद्ध वायव्येकडील पाकिस्तानात यवनांशी होणार होते. पाकिस्तानात विरूद्ध बाजुने इमरान खान, वसीम अक्रम , वकार युनूस नावाचे कृर वेगवान आक्रमक योद्धे होते.

कुमार सचिनकडे बघुन ते हसु लागले ''ये तो बच्चा है अभी! यह बच्चा क्या टीकेगा हमारे सामने !'' अशी निर्भत्सना करू लागले. सियालकोट या कुरूक्षेत्रावर चौथे कसोटी युद्ध आरंभले.शंख फुंकले.. युद्धाच्या शेवटच्या दिवशी भारत मुलूखाची अवस्था फार बिकट होती. सुरवातीचे ज्येष्ठ रथी महारथी परतले होते. मुलूख वाचवणे ही 'कसोटी' होती. आणि योद्ध्याच्या शुभ्र वेषात कुमार सचिन कुरूक्षेत्रावर हातात फळी अस्त्र घेउन, पाय आणि हाताच्या कोपरांवर चिलखती आवरणे घालुन उतरला. आपल्या खास नेत्रदिपक उभे राहण्याच्या शैलीत हाती फळी शस्त्र यवन गोलंदाजासमोर घेऊन उभा ठाकला! पुन्हा युद्धास प्रारंभ झाला...सचिनच्या अंगावर वेगवान खान, अक्रम, युनुस सरदार गोलास्त्राचा तीव्र मारा करू लागले. कुमार सचिन ते आपल्या फळीवर तर कित्येक वेळा अंगावर झेलू लागला.. पण... एका क्षणी वकार युनुस या वेगवान योद्ध्याचा आपटुन टाकलेला गोलास्त्र सचिनच्या चेहऱ्यावर नाकावर आदळले ! कुमारच्या नाकातून भळाभळा रक्त निघू लागले.. मोठी जखम झाली.. समोर सोबतीला पंजाबचा तत्कालीन नवज्योत सिद्धु सरदार उभा होता...त्याने ताबडतोब वैद्यकीय सेवा मागवली.. सचिन मैदानावरच जखमी अवस्थेत होता. वैद्यांनी ताबडतोब उपचारासाठी मैदान सोडण्यास सांगितले. विरूद्ध पक्षापासुन सिद्धु सरदारापर्यंत सर्वांना कळले की हा कुमार आता मैदान सोडणार.. कुमार शांत राहिला. कुमार सचिनने जल पात्रातुन स्वत: स्वत:ची जखम धुतली..रक्त पुसले... आणि त्या क्षणी रणांगणावर जे शब्द कुमार बोलला ते ऐकणारा सिद्धु सरदार आणि ते वैद्य हे नशीबवान ठरलेत. कुमार सचिनच्या डोळ्यात आग होती. तो सरदार आणि वैद्याला मुंबापुरी परगण्यातील भाषा शैलीत इतकच बोलला ''मै खेलेगा !! '' सर्वजण कुमाराचं ते बोलणं ऐकुन अवाक् झालेत! पुन्हा युद्धास प्रारंभ झाला..कुमार सचिन त्याच्या खास शैलीत फळी अस्त्र घेउन उभा राहिला.. आणि वकार युनूस नामक वेगवान पाकी सरदाराने टाकलेल्या पुढच्याच गोलास्त्राला कुमार सचिनने सीमापार टोलवला.... त्यानंतर इतिहास घडला. इतिहास घडत राहिले.

१६ व्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या साक्षीने आपले रक्त सांडुन स्वराज्याची शपथ घेतली होती. त्याच प्रकारे १६ व्या वर्षी पापस्थानावरील भुमीवर आपले रक्त सांडुन कुमार सचिनने प्रतिज्ञा केली ''हे स्वर्गस्थ देवादिकांनो, पितरांनो, शक्तींनो मी तेंडुलकर कुलोत्पन्न, रजनी-रमेश पुत्र स्वरक्त सांडुन प्रतिज्ञा करतोय जोवर भारतीय मुलुखाचं स्वराज्य स्थापन करणार नाही तोवर युद्धातुन सक्रिय निवृत्ती घेणार नाही!

पुढे १९९२ मध्ये आफ्रिके सोबत दिवस रात्रीचे अटीतटीचे युद्ध जाहले..शेवटच्या क्षणी गोलास्त्राचा मारा कोण करणार प्रश्न पडला!
क्रिकेटशाहीर प्रसंगाचं वर्णन करित म्हणतो;

"आफ्रिकेची किर्ती बेफाम
भल्या भल्यांना फुटला घाम!

 
सेनापती अजहरने दरबार बोलावला!
मोठमोठ्या गोलंदाजांसमोर विडा फिरवला

 
नजरेत सगळ्यांच्याच डर
कोणी घेई ना पुढाकार
साऱ्यांनीच मानली हार

 
तेवढ्यात उठला एक मराठी सरदार!
नाव त्याचे सचिन तेंडुलकर!

 
त्याने विडा उचलला!


तो म्हणला मी टाकीन गोलास्त्र!


एक फळीशस्त्र चालवणारा... भल्या भल्यांनी जेथे हात वर केलेत तेथे हा शेवटच्या क्षणाला ह्रदयाच्या ठोके बंद पाडणाऱ्या युद्धात गोलास्त्र टाकणार! पण विश्वासाने भरलेल्या त्या सुकुमाराने भेदक अचुक वेधक गोलास्त्र टाकुन दोन बळी घेत भारतीय मुलूखाला विजयी केले! १९९६ मध्ये कुमारचा पराक्रम पाहता त्याचा राज्याभिषेक जाहला ! ते मुलूखाचे राजे बनले ! "मराठी पाउल पडते पुढे.." पण चंदनाला फुलं नसतात..सोन्याला सुगंध नसतो.. त्या प्रकारे प्रत्येकात सर्वच गोष्टी नसतात.. राजे तेंडुलकरांना राज्यपद नीट लाभलं नाही ! राज्यपदाच्या अतिरिक्त ताणामुळे त्यांच्या स्वत:च्या पराक्रमावर परिणाम होऊ लागला..अंती त्यांनी स्वत:हुन सिंहासनाचा त्याग केला! आणि बाजीराव पेशव्यांनी स्वराज्याच्या सिंहासनाशी प्रामाणिक राहुन अटके पार झेंडे लावले त्या प्रमाणे एक योद्धा राहुनच "लंडनचेही तख्त मिळवतो महाराष्ट्र भारत माझा असा प्रण केला. १९९८ साली अरबस्थानातील वाळवंटात; शारजेच्या रणांगणावर घनघोर युद्ध जाहले ते अपराजीत महाशक्तीशाली ऑस्ट्रेलियासोबत!

२२ एप्रिलची ती रात्र ! परिस्थिती वाईट ! अंतिम महायुद्धात प्रवेश मिळवण्यासाठी अद्वितीय कामगिरी आवश्यक होती ! तुंबळ युद्ध सुरू झाले. आणि अचानक वाळवंटात वाळुचे वादळ उठले. युद्ध थांबवावे लागले. राजे सचिन आपल्या गोटात मस्तकावरील शिरस्त्राण न काढता आसनावर जाउन बसले..कोणाशीही एक शब्दही न बोलले.. नजर फक्त समोर कुरूक्षेत्राकडे. काही वेळाने वाळुचे वादळ शमले. युद्धास पुन्हा प्रारंभ झाला. अष्टमीची रात्र होती. नगाडे ढोल वाजत होते. महाराज पॅवेलियन गडावरून खाली येत होते. एक वादळ शमले आणि दुसरे या मराठी सरदाराचे वादळ सुरू झाले! समोर हैद्राबादेच्या "लक्ष्मणाला" हाताशी धरून हा राम शत्रुवर तुटून पडला! ऑस्ट्रेलियाच्या साऱ्या फौजेला नेस्तनाभुत केले ! ऑस्ट्रेलियाचा "गोंधळी" टाकणारा मायावी गोलंदाज शेनवार्न ला पुर्णपणे झोडपुन काढले. "गोंधळी"ला आंग्ल भषिक "गुगली"असे म्हणतात. यावच्चंद्रदिवाकरौ २२ एप्रिल आणि २४ एप्रिल या तारखा इतिहासात अमर झाल्या आहेत! त्या दिवशी राजेंचा पराक्रम बघुन अरबस्थानातील वाळवंटातील खजुराची झाडेही शहारलीत..अरबांच्या उंटांनीही कौतुकाने माना डोलवल्यात.. मुघलांच्या घोड्यांनाही पाण्यात जसे मराठी सरदार दिसायचे ! तसे शेन वार्न नामक मायावी गोलंदाजाला स्वप्नातही सचिन राजे त्यांना झोडपताहेत हे दिसु लागले !


१९९९ मध्ये साता समुद्रापार गोऱ्यांच्या इंग्लंडात जागतिक महायुद्ध जाहले. राजे सचिन संपुर्ण तयारीनिशी युद्धात उतरले. पण नियतीच्या मनात काय होतं हे कोणासही ठाउक नव्हतं..एक मोठा आघात राजेंवर होणार होता. तिकडे महायुद्ध पेटले होते. आणि मुलूखात इकडे राजे सचिनचे पिताश्री नश्वर जग सोडुन गेले. राजे वायुवेगाने मुलूखात परतले..आपले पित्या संबंधी कर्तव्य बजावले. तेव्हा माता रजनी आपल्या सुपुत्रास म्हणल्या "सैनिकाने आपले वैयक्तिक नातीगोती आपल्या कर्तव्याआड आणु नये ! मुलुखाचं वाण हाती घेतलेल्या योद्ध्याला अश्रु ढाळता येत नाही ! व्रतस्थ माणसाला फार काळ सुतक पाळता येत नाही ! राजे तुम्ही युद्धावर जावे स्वराज्याला तुमची गरज आहे ! सचिन राजेंनी मातेस नमस्कार केला. आणि महायुद्धात परतले. इकडे "एक व्यक्ती फौज" असलेल्या सचिन राजेंच्या अनुपस्थित भारतीय मुलुखाने दुबळ्या झिंबॉब्वे सोबत युद्ध हारले होते. आता केनियावर मोठा विजय गरजेचा होता. राजे सचिन गोटात परतत नाहीत तर तोच त्यांना हाती शस्त्र घेउन युद्धावर जावे लागले.. त्या दिवशी त्यांनी जो पराक्रम केला.."शतक रत्न" लुटलीत! आकाशात त्यांनी बघुन वडिलांना ते शंभर रत्न अर्पण केलेत.. सर्व भारतीयांना कोण अभिमान वाटला!!

राजे सचिन जणु स्वत: स्वत:ची संहिता लिहीत होते. मग २००३ साली आफ्रिकेत पुन्हा जागतिक महायुद्ध छेडले गेले. महाशिवरात्रीला पाकिस्तानासोबत महायुद्ध होणार होते. दरम्यान भारतीय मुलुखाला जो फितुरीचा शापच आहे तो शाप पुन्हा खरा ठरला..स्वराज्य स्थापनेला मोठा धक्का बसला. २००३ साली आफ्रिकेत पुन्हा जागतिक महायुद्ध छेडले गेले. तो एक मार्च चा दिन उजाडला. देशात त्यावेळी महाशिवरात्रीचा सण होता. तिकडे दक्षिण आफ्रिकेत पारंपारिक शत्रू पाकिस्तानासोबत युद्ध आरंभ झाले. देशाची स्थिती बिकट होती. पाकी सैन्याकडे अक्रम, वकार, अख्तर, रझाक सारखे बलाढ्य अरिहंतक गोलंदाज होते. देशात इकडे प्रजा महाशिवरात्रीला शंकराला आळवू लागली! तांडव स्तोत्र पठण करू लागली!

"जटाटविगज्जल प्रवाहिपाविस्थले..डमड्मड्मड्मडम्ड् निनाद ..चकार चंड तांडवम् तनो तनुः शिवः शिवम्!


सेहवाग 'वीराला' सोबतीला घेऊन राजे सचिन हाती खड्ग घेउन रणांगणात उतरले. जणू साक्षात रुद्रच त्यांच्यात प्रवेश करून शिवतांडव करू लागला! क्रिकेटशाहीर त्या दृश्याचं वर्णन करतो,
"दौडुनी आला शोएब अख्तर,
टाकीला त्याने शिरवेध आपटबार!
तत्क्षणी
राजे सचिन मागील पावलावर झपकन सरले
हातातील खड्ग
सपकन फिरवले !
अखतर तर चे शिराचा वेध घेणारे आपटबार सीमारेषेपलीकडे जाऊन पडले!
झाला अख्तर जर्जर!
सचिन राजेंचा जयजयकार!!


पुढचा काळ मात्र राजेंसाठी कठीण होता! सततच्या अति युद्धामुळे परप्रांतावरील आक्रमणांमुळे कुमारचे 'कोपर' झिजले. सगळयांना वाटले कुमार संपला ! पण कुमारावर साक्षात ईश्वराचा आणि मातेचा आशीर्वाद होता !! तोही काळ संपला आणि कुमार त्वेषाने तुटून पडला ! आफ्रिकेविरुद्ध दोनशे रत्न लुटलीत ! दरम्यान अत्यंत कठीण दुर्गम अपराजित ऑस्ट्रेलिया बेटावर देशाच्या सैन्याने विजय मिळवला. तेव्हा त्या बेटावरील स्वारीत शतक रत्ने लुटल्यावर किर्तनकार रवी 'शास्त्री'ने तत्क्षणी राजेंची आंग्ल भाषेत स्तुती केली " Cometh the hour cometh the champion!"


२०११ वर्ष उजाडले. हे वर्ष होते विश्वयुद्धचे !! वेळ होती अश्वमेध यज्ञाची ! कुरुक्षेत्र साक्षात स्वदेश भूमी होती ! या विश्वयुद्धात राजेंनी पराक्रमाची पराकाष्टा केली आणि लंकेविरुद्ध महाविजय भारतीय सेनेचा सेनापती महेंद्र बाहुबलीने सीमापार फटका हाणून जिंकला! राजेंना अश्रू अनावर झाले. संपूर्ण संघाने राजे सचिनला खांद्यावर उचलून त्यांची वरात काढली! देश जिंकला. राष्ट्र विजयी झाले. विश्वयुद्ध जिंकले. अश्वमेध यज्ञ यशस्वी झाला! राष्ट्राने विजयपत्र मिळवले. यासाठीच केला होता अट्टाहास! ईश्वराने यासाठीच जणू अवतार घेतला होता! ते कार्य पूर्तीस गेले. घेतलेला अवतार संपवावा लागतोच. ती वेळ नजीक येत होती. दरम्यान राजेंनी एक महापराक्रम केला तो म्हणजे शतकांचे शतक करण्याचा! शंभर रत्ने शंभर वेळा लुटलीत!! आणि तो दिन आला जेव्हा राजे सचिनने युद्धातून सक्रिय निवृत्ती घेतली. त्यांची कर्मभूमी मुंबापुरी, येथे त्यानी त्यांच्या जीवनातील अखेरचे युद्ध खेळले. त्यातही पराक्रमाची शर्थ केली.

 
युद्ध संपल्यावर भर रणांगणात त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांची पत्नी, मुलं, भाऊ हजारो प्रजा उपस्थित होती. संपूर्ण विश्व राजेंना अखेरचे रणांगणात बघत होतं. सगळयांचे डोळे पाणावले. गळे भरून आले. अश्रुधारा लागल्यात ! विरुद्ध सैन्य ही स्वतःला नशीबवान समज होते त्या सोहळ्याचे साक्षीदार झालेत म्हणून ! वर आकाशातुन देवगण जणू त्यांना युद्ध निवृत्तीला शुभेच्छा देत पुष्पवर्षाव करत होते. अश्याप्रकारे या ईश्वराने आपली रणांगणावरील अवतार समाप्ती केली.

एक सचिन पर्व सरले. सचिनाख्यान संपले.


पण खरेच का सचिनाख्यान संपले ? नाही सचिनाख्यान संपले नाही. सचिनाख्यान संपत नसते.

- अभिजीत पानसे
@@AUTHORINFO_V1@@