जळगाव :
प्रत्येक स्त्रीला माहेरची ओढ असतेच, माहेर म्हणजे आपण जशा आहोत तसे स्विकारणारी, आनंदाने वावरण्याची जागा...आपणही सार्या अशाच मोठे मन, मोठे विचार करीत आपले घर एकमेकींना, इतर भगिनींना माहेर वाटेल असे उपलब्ध करुन देऊ या, तसे आचारविचार ठेवूया, सुनेलाही ते माहेर वाटू द्या, असे भावनिक व समर्पक आवाहन विवेकानंद प्रतिष्ठानच्या संचालिका आणि उद्यमी महिला पतपेढीच्या संस्थापिका, सामाजिक कार्यकर्त्या हेमाताई अमळकर यांनी आज येथे केले.
माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित ‘जळगाव तरुण भारत’ तर्फे अक्षयतृतीयेनिमित्त आज रविवारी २२ एप्रिलला आयोजित ‘माहेर’ उपक्रमात उद्घाटक या नात्याने त्यांनी हा नवा विचार मांडला. नियोजनानुसार बहुसंख्य माहेरवाशिणींनी सकाळी ‘तरुण भारत’ कार्यालयात नावनोंदणी केली. सकाळी पहिली बस कार्यक्रमस्थळाकडे मार्गस्थ झाली. आमदार सुरेश भोळे, माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्रजी लढ्ढा, केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे सचिव रत्नाकर पाटील, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्रीकांत खटोड, रा.स्व.संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दीपक घाणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करुन व श्रीफळ वाढवण्यात आले.
शिरसोली मार्गावरील दि आर्यन फॉर्मच्या निसर्गरम्य परिसरात आणि आल्हाददायक, चैतन्यपूर्ण वातावरणात सकाळ ते सायंकाळ हा संस्कृती व संस्कारपूर्ण उपक्रम झाला.
मंचावर त्यांच्यासह ‘बेटी बचाव, बेटी पढाव’च्या राज्य समन्वयक प्रा.डॉ. अस्मिता पाटील, नगरसेविका ऍड.सुचिता हाडा, दीपमाला काळे, जयश्री पाटील आणि मिनाक्षी प्रकाश वाणी, भुसावळच्या रजनी संजय सावकारे या मान्यवर होत्या.
महिलांच्या जल्लोषपूर्ण वातावरणात फार्ममधील सभागृहात प्रारंभी उद्घाटन झाले. त्यात हेमाताई यांनी आपल्या बालपणीच्या, कोल्हापूर येथील माहेरच्या हृद्य आठवणींना उजाळा देत हा विचार मांडला.
प्रत्येकीलाच माहेरची ओढ असते, पण काळाच्या ओघात अनेकींचे माहेर काही ना काही कारणांमुळे दुरावलेले असले तरी ओढ कायम असतेच. आपणही सार्या अशाच मोठे मन, मोठे विचार करीत आपले घर एकमेकींना, इतर भगिनींना माहेर वाटेल असे उपलब्ध करुन देऊ या, तसे आचारविचार ठेवूया, सुनेलाही ते माहेर वाटू द्या, असे मनोज्ञ प्रतिपादनही त्यांनी केले.
हेमांगी डहाळे यांनी माहेराबाबत भावना व्यक्त करणारी कविता सादर केली.
माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे सचिव स्वप्निल चौधरी यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला आणि सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
श्वेता पाठक यांनीही संवाद साधला.
नंंतर समयोचित म्हणून ‘जॉनी मेरा नाम’ या सुपरहीट ठरलेल्या चित्रपटातील ‘ओ बाबूल प्यारे’ हे माहेरबाबतच्या भावभावना व्यक्त करणारे इंदिवर रचित गीत वाजवण्यात आले. दिवसभरातील विविध आनंददायी आणि स्पर्धात्मक उपक्रमांचे रश्मी जैन, उर्मिला चौधरी, विशाखा देशमुख, श्वेता पाठक यांनी सूत्रसंचालन केले.
मेहंदी स्पर्धा
नंतर सभागृहात मेहंदी स्पर्धा झाली. सार्यांना प्रारंभी नावनोंदणीच्या वेळी मेहंदीचे कोन, मोगर्या गजरा, अत्तराची बॉटल देण्यात आलेले होते. बहुतेक माहेरवाशिणींनी आपले हात सुंदर मेहंदीने कलाकत्मकरित्या रंगवले होते. ३२ जणींच्या मेहंदीचे परिक्षण करुन त्यातून १० जणींची निवड करण्यात आली.
विजेत्या अशा- प्रथम क्रमांक- सपना छोरिया, दुसरा-योगिता चौधरी, तिसरा क्रमांक-पल्लवी माळी, चौथा- प्रिती जैन, पाचवा-आरती सुराणा, सहावा-दिक्षा अडवाणी, सातवा- सपना सुराणा, आठवा-वैष्णवी भंगाळे, नववा पूनम सावदेकर, दहावा- शैला विनोद नेवे. परीक्षण हेमाताई अमळकर, शुचिता हाडा, दीपमाला काळे, जयश्री पाटील, रजनी सावकारे, मिनाक्षी वाणी यांनी केले.
पपेट शो
सर्वच आबालवृद्धांना जागीच खिळवून ठेवणारा पपेट शो (बोलक्या बाहुल्या) हा संगीतमय कार्यक्रम चोपडा येथील प्रसिद्ध कलावंत दिनेश मधुकर साळुंखे (चोपडा येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील कलाशिक्षक) यांनी सादर केला. लोकप्रिय सिनेगितांवरील या कार्यक्रमाने सार्यांना वेगळ्यात विश्वात नेले. आयुष्यभर मनात जपून ठेवावा, असा हा आनंददायी उपक्रम झाला. ‘पाणी हरवले, पाणी हरवले’ या गाण्याने पर्यावरणाचे आणि पाणी वाचवण्याचे महत्त्व ठसवले. ‘हुंडा नको मामा, पोरगी द्या मला’ या गाण्याने लग्नाविना तळमळत जगणार्या विवाहेच्छुची व्यथा मांडली आणि स्त्रीभृण हत्त्या थांबवण्याचा संदेश दिला.
रंगतदार उखाणे स्पर्धा
दुपारनंतर सर्वांची आवडती उखाणे स्पर्धा झाली. १ मिनिटाच्या अवधीत जास्तीत जास्त उखाणे घेण्याच्या स्पर्धेत बहुसंख्य माहेरवाशिणींनी भाग घेतला. कुणी बोलीभाषेतील लहेजात, कुणी ठसक्यात, विनोदी ढंगात, ‘तरुण भारत’ शब्द गुंफून, व्हाटस्
अप-फेसबुकच्या जमान्यातील उखाणे घेत रंगत वाढवली. या स्पर्धेत स्मरणशक्तीचा, पाठांतराचा चांगलाच कस लागला. अनेकवेळा हास्यस्फोटही झाले. विजेत्यांना रजनी सावकारे यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.
विजेत्या अशा : प्रथम- सुचेता कुळकर्णी,
द्वितीय - प्रिती महाजन आणि अश्विनी पिंगळे
तृतीय - हेमांगी डहाळे
संगीत खुर्ची : मोना भंगाळे प्रथम
सर्वांची लहानपणापासूनची आवडती संगीत खुर्ची स्पर्धा २ गटात झाली. मोठ्या संख्येने यात सहभाग राहिला. ४० वर्षाच्या आतील गटात मोना भंगाळे प्रथम, चारुलता वाणी दुसर्या आणि योगिता संतोष तायडे या तिसर्या ठरल्या.
प्रथम-विद्या जैन,
(४० वर्षावरील वयोगटातील महिला)
प्रथम-विद्या जैन, द्वितीय-भारती, राजपूत, तृतीय-लतिका पाटील, चतुर्थ-भारती मधुकर पंडीत (केकतनिंभोरा ता.जामनेर), पाचव्या- अंजली रमेश शहा.
गॅस सुरक्षितता, बचत आणि बक्षिसे
प्रत्येक महिलेला, गृहिणीला स्वयंपाक करताना गॅस सुरक्षितता आणि त्याची बचत याबाबत काळजी, दक्षता घ्यावीच लागते, याबाबतचे अतिशय सोपे मार्गदर्शन भूषण गॅस एजन्सीचे व्यवस्थापक अजय ठोमरे यांनी प्रात्यक्षिकासह केले. दर २ वर्षांनी गॅस कीटची तपासणी अनिवार्य आहे, ती केली तरच दुर्दैवाने काही हानी झाल्यास भरपाई मिळू शकते, हेही त्यांनी बजावले. नंतर त्यांनी काही प्रश्न विचारले, त्यावर समर्पक उत्तर देणार्या हेमांगी डहाळे, सपना नेवेवाणी, हर्षा पाटील,वनिता महाबळ आदींना बक्षीसे योगिता चौधरी आणि मिनाक्षी चौधरी यांच्या हस्ते देण्यात आली.
यांचे लाभले उदार सहकार्य
के.के.कॅन्सचे आदर्श कोठारी, ‘यामाहा’ श्रेयांस ऑटोमोबाईलचे संचालक नितीन रायसोनी, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल प्रेमदादा रायसोनी, प्रकाशकुमार रामदास ग्रेन मर्चन्ट फर्मचे प्रकाश व मिनाक्षी वाणी, रोबोटिक वर्कशॉपसाठी महेश बारसू फालक, ‘लर्न वईथ फन’ साठी ‘कुतूहल’चे प्रा.महेश गोरडे, विश्वविख्यात ‘दाल परिवार’चे प्रेम कोगटा, सुभाष चौक अर्बन पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड, विजयकुमार रामदास फर्मचे विजयकुमार वाणी, निवास हर्बल मेहंदीचे सुभाष पाटील आदींचे ‘माहेर’ च्या आयोजनात सहकार्य लाभले.
विशेष गौरव
कडक उन आणि उष्म्याची पर्वा करता लहानग्या बाळांना सोबत घेऊन आलेल्या आणि त्यांची काळजीही घेत सार्या कार्यक्रमांचा आनंद लुटणार्या माहेरवाशिणी सौ.निकीता किशोर खोबरे आणि जयश्री अहिरराव तसेच सर्वात प्रथम नावनोंदणी करणार्या मंगला जगदीश नारखेडे , ६५ वर्षावर वय असूनही आनंद, उत्साहाने सहभाग देणार्या इंदुताई चंद्रकांत खाचणे यांचा विशेष गौरव समारोपप्रसंगी भेटवस्तू देऊन करण्यात आला