मुंबई - उन्हाळा आता राज्यात जम धरू लागला आहे. राज्यात विविध ठिकाणी उष्णतेची लाट पसरली आहे. आता या उन्हाच्या झळा मुंबईला देखील मोठ्या प्रमाणात बसणार आहेत. येत्या सोमवार ते बुधवार या काळात मुंबईचे तापमान ३६ अंशापर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
शनिवारी मुंबई येथे कमाल तापमान ३३.७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४.२ अंश नोंदवण्यात आले. मात्र येत्या ३ दिवसांमध्ये तापमानात वाढ होणार असल्याने मुंबईकरांच्या त्रास सहन करावा लागणार आहे. तशीच मुंबईची हवा दमट असल्या कारणाने मुंबईकरांना उन्हाळ्यात अधिक त्रास होतो, मात्र आता उष्णतेच्या या लाटीमुळे या त्रासांमध्ये अधिकच भर पडली आहे.
दरम्यान, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, किमान बुधवारपर्यंत ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. चंद्रपूरमध्ये शनिवारी सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सरासरी तापमानापेक्षा चंद्रपूर येथील तापमान २ अंशांनी अधिक होते.