खळखट्टाक करणाऱ्या मनसेचा
फेरीवाल्यांसाठी पुढाकार
मुंबई : फेरीवाल्यांविरोधात खळखट्टाक करणाऱ्या मनसेनेच आता फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाह व पूनर्वसनासाठी पुढाकार घेतला आहे. फेरीवाल्यांचे लवकरात लवकर पुर्नवसन करावे या मागणीसाठी आज मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. आयुक्तांनी मनसेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत १५ दिवसांत निर्णय घेऊ असे आश्वासन दिले अशी माहिती मनसेचे उपाध्यक्ष व माहीम विधानसभेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली.
एल्फिस्टन दुर्घटनेननंतर या घटनेला फेरीवाले जबाबदार असून त्यांच्या विरोधात मोर्चा काढत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यानी फेरीवाल्याच्या स्टॉलची तोडफोड करून त्यांचे मोठे नुकसान केले होते. तसेच फेरीवाले आणि कार्यकत्यामध्ये बाचाबाची झाली होती.
पालिकेने फेरीवाला धोरण लागू करण्यासाठी सर्वेक्षण केले होते.सर्वेक्षणामुळे फेरीवाला धोरणाला विलंब होत आहे. परिणामी फेरीवाले हवालदिल झाले आहेत. त्यांना उदरनिर्वाह, मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न भेडसावत आहे. काही फेरीवाल्यांचे सर्व या धंद्यावर अवलंबून आहे. शासनाच्या दिरंगाईमुळे फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचे त्यांचे पुनर्वसन करुन उपजिवीकेचे साधन उपलब्ध करुन द्यावे. तसेच टप्पाटप्प्याने फेरीवाल्यांचे धोरण लागू करावे व त्याची सुरुवात जी उत्तर व जी दक्षिण विभागातून करावी, अशी मागणी किल्लेदार यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली. यावेळी येत्या १५ ते २० दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याचे किल्लेदार म्हणाले.