नवी दिल्ली : दलित संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद' आंदोलनामध्ये आता देशपातळीवरील विरोध पक्षांनी देखील उडी घेतली आहे. दलित संघटना आणि भारत बंद आंदोलनाला पाठींबा देण्याच्या नावावर देशातील विरोधी पक्षांनी आता केंद्र सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. तसेच केंद्र सरकार हे दलित विरोधी असल्याचे चित्र विरोधी पक्षांकडून रंगवले जात आहे.
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दलित आंदोलनांवरून भाजप आणि रा.स्व.संघावर जोरदार टीका केली आहे. दलित समाजाला कायम कनिष्ठ वागून देणे हे भाजप आणि संघाच्या रक्तात आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच या विरोधात आवाज उठवणाऱ्या दलित समाजाला कायम हिंसेच्या जोरावर दाबले जाते, असा आरोप ही राहुल यांनी केला आहे. तसेच या आंदोलनाला कॉंग्रेसकडून पाठींबा असल्याचेही त्यांनी अप्रत्यक्षपणे जाहीर केले आहे.
बिहारमध्ये 'भारत बंद'च्या नावाखाली अनेक ठिकाणी जाळपोळ सुरु आहे. दलित संघटनांकडून जागोजागी रस्ता रोको आणि रेल रोको केला जात आहे. अशामध्ये राजद नेते लालू पुत्र तेजस्वी यादव यांनी या बंदला आपला पूर्ण पाठींबा असल्याचे जाहीर केले आहे. मोदी सरकार हे मुळातच दलित विरोधी असल्याची प्रतिक्रिया यादव यांनी दिली आहे. सरकारला जर खरच दलितांची काळजी असेल तर नेहमीच सरकार का दलित विरोधी निर्णय घेते ? तसेच एससी/एसटी अॅक्टमध्ये ज्यावेळी बदल केला गेला त्यावेळी देखील सरकार शांत बसले होते, असे का ? असे प्रश्न यादव यांनी उपस्थित केले आहे. त्यामुळे राजदच्या या बंदला पाठींबा असून राजद आमदार देखील या बंदच्या समर्थानार्थ एक मोर्चा काढणार असल्याचे यादव यांनी जाहीर केले आहे.
दिल्लीतील आम आदमी पक्षाने देखील या बंदांसाठी केंद्र सरकारला दोषी ठरवत सरकावर टीकेची झोड उठवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे एससी/एसटी अॅक्ट हा अत्यंत कमकुवत झाला आहे. त्यामुळे दलितांवर होणाऱ्या अत्याचारात यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु सरकार मात्र अद्याप यावर शांत बसले असून मोदी यावर काय करत आहेत ?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मोदींनी लवकरात लवकर यावर नवा अद्यादेश जारी करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.