अमृतसर : इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेकडून हत्या करण्यात आलेल्या ३८ भारतीयांचे मृतदेह इराकची राजधानी बगदाद येथून घेवून देशाचे परराष्ट्र राज्यमंत्री जनरल वी.के. सिंग हे मायदेशी (भारतात) परतले आहेत. आज दुपारी अमृतसर येथील विमानतळावर या ३८ भारतीयांचे मृतदेह आणण्यात आले असून आता या ३८ भारतीयांच्या मृतदेहांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविले जाणार आहे.
हे काम फार कठीण होते, या ३८ भारतीयांचे मृतदेह आता त्यांच्या नातेवाईकांना सोपविले जातील अशी माहिती वी.के. सिंग यांनी मायदेशी परतल्यावर पत्रकारांशी बोलतांना दिली. भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानातून हे ३८ भारतीयांचे मृतदेह परत आणण्यात आले आहेत.
प्राण गमावलेल्या सर्व भारतीयांच्या जवळच्या नातेवाईकांशी सिंग आता भेट घेणार असून त्यांच्या ताब्यात हे मृतदेह देण्यात येणार आहेत. यासाठी मृतांच्या संबंधित सर्व राज्यांमध्ये ते जाणार आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून इराकमध्ये बेपत्ता असलेल्या या सर्व भारतीयांची इसीसकडून हत्या झाल्याचे गेल्या महिन्यात उघड झाले. इराकने मोसुलवर मिळवलेल्या विजयानंतर याठिकाणी काही कबरींचा शोध घेत असता यामध्ये या ३८ भारतीयांचे काही अवशेष आणि मृतदेह इराक सरकारच्या हाती लागले होते. ही माहिती भारत सरकारला कळल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत याविषयी माहिती दिली होती. तसेच हे सर्व मृतदेह लवकरच भारतात परत आणले जातील, असे आश्वासन देखील त्यांनी दिले होते.