नाशिक : राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाऊंडेशन जोमाने कामाला लागली आहे. नाशिक जिल्ह्यानेही पाणी फाऊंडेशन आयोजित ’सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत सहभागी असलेल्या गावांना तसेच जलयुक्त शिवारांतर्गत श्रमदानाची चांगली कामे करणार्या गावांना दीड ते ३ लाखांपर्यंतचा निधी डिझेलसाठी मिळणार आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी त्याबाबतची घोषणा केली आहे.
अभिनेता आमीर खान यांच्या ’सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेसाठी यंदा जिल्ह्यातील दोन तालुक्यांची प्रथमच निवड झाली आहे. यामध्ये चांदवड आणि सिन्नर तालुक्यातील एकूण १०० गावांची निवड झाली आहे. २४ मे पर्यंत चालणार्या या स्पर्धेत सिन्नरमधील ५१ तर चांदवडमधील ४९ गावांचा समावेश आहे. निवड झालेल्या गावांमध्ये स्पर्धा सुरूही झाली आहे. दरम्यान, स्पर्धेत सहभागी गावांमध्ये इंधनासाठी प्रत्येकी दीड लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली. स्पर्धेत निवड झालेल्या गावांना येत्या काळात भेट देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात जलयुक्त शिवारात चांगली कामे झाली आहे. यंदाही २०१ गावांची जलयुक्तसाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या गावांमध्ये सुमारे ४५०० हजार कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये नाला खोलीकरण व रुंदीकरण, विहीर पुनर्भरण, सिंचन विहीर बांधणे आदी विविध प्रकारची कामे करण्यात येत आहेत.
आर्थिक मदत
राज्य सरकारच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात काम सुरू आहे. जलयुक्त शिवारामध्ये चांगले कार्य करणार्या गावांना दीड ते तीन लाखांपर्यंतची आर्थिक मदत डिझेलसाठी देण्यात येणार आहे