वनवासी समाजाने संघर्षरत राहून हिंदू संस्कृती टिकवली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2018
Total Views |

विराट हिंदू संमेलनात सरसंघचालकांचे प्रतिपादन

 
 
 
मुंबई : जो शेवटपर्यंत लढला परंतु दुष्ट शक्तींना शरण गेला नाही तो आदिवासी समाज. आदिवासी समाजाने कायम सनातन हिंदुत्व आणि वैदिक परंपरा जपण्याचे कार्य केले आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. विश्व हिंदू परिषदेच्या प्रेरणेतून तलासरी येथे सुरु झालेल्या जनजाती वसतीगृह प्रकल्पाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष होते. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहाच्या निमित्ताने डहाणू येथे आज विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. भागवत यांनी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी सवितानंद महाराज, बालयोगी सदानंद महाराज, महामंडलेश्वर बाप्पा, अशोक चौगुले, देवकीनंदन जिंदाल आदी मान्यवर देखील उपस्थित होते.
 
 
वनवासी हा आपला बंधू आहे, पण आपण त्याला उपेक्षित ठेवले. असे करून चालणार नाही. आपल्या मुलाबाळांना, उर्वरित समाजाला त्याचा परिचय करून दिला पाहिजे. पुढील पिढ्यांपर्यंत हे संचित पोहोचविले पाहिजे. परस्परांतील एकता जपली पाहिजे. त्यांना प्रगतीची संधी दिली पाहिजे. स्वतःच्या उत्पन्नाचा एक तृतीयांश हिस्सा आणि आयुष्यातील एक तृतीयांश वेळ या समाजाच्या कल्याणासाठी खर्च केला, तर लवकरच हा समाज मुख्य प्रवाहात येईल, असा विश्वास भागवत यांनी यावेळी व्यक्त केला. समाजातील एकजूट कायम राहिली तर अनेकांची स्वार्थाची दुकाने लवकरच बंद होतील. गोड बोलून, आपला कळवळा दाखवणारी आणि धर्मांतर करणारी ही मंडळी मायावी आहेत. दोन बोक्यांच्या भांडणात लोणी खाऊन जाणारी ही माकडाची प्रजात आहे. अशांपासून आपण सजग राहणे आवश्यक आहे, असा इशारा देतानाच सरसंघचालकांनी तलासरी प्रकल्पाने असे अनेक सजग कार्यकर्ते तयार केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

 
 
सरसंघचालक पुढे म्हणाले की, “भाषा, प्रांत, जातीची ओळख सांगताना आपले हिंदू असणे ही मुख्य ओळख आपण विसरत चाललो आहोत. आपल्या आयुष्याच्या प्रवासातील हिंदू असणे हे महत्वाचे जंक्शन आहे. आपल्यासारख्या पांथिकांना हे जंक्शन सापडू नये म्हणून अनेक जण धडपडत आहेत. भारतात हिंदुत्वाचे स्मरण कोणाला होऊ नये यासाठी मेकॉले पासून अनेकांनी प्रयत्न केले आहेत. सध्या त्याचाच कित्ता ठराविक मंडळी गिरवत आहेत. त्यांच्यापासून दूर राहणे आणि हिंदू ही ओळख जपण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे.”
 
 
अयोध्येतील राममंदिर उध्वस्त करणारा भारतातील मुस्लीम समाज नव्हता. भारतीय नागरिक असे करूच शकत नाही असे परखड मत भागवत यांनी व्यक्त केले. परकीय शक्तींनी भारतीयांचे खच्चीकरण करण्यासाठी येथील मंदिरे उध्वस्त केली. पण आज आपण स्वतंत्र आहोत. जे जे उध्वस्त आहे, ते ते पुन्हा उभे करण्याचा आम्हाला अधिकार आहे. कारण ही केवळ मंदिरे नव्हे, तर आमच्या अस्तित्वाची ओळख आहेत. राम मंदिर उभे राहिले नाही तर आमच्या संस्कृतीचे मूळ कापले जाईल. मंदिर जेथे होते, तिथेच ते बनणार यात शंकाच नाही असा निर्धार भागवत यांनी व्यक्त केला.

 
 
सुमारे ६० हजार उपस्थिती असणाऱ्या या विराट हिंदू संमेलनाला, पालघर जिल्ह्याच्या सुदूर वनवासी भागांतून हिंदू बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमात हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून वन-जन गाथा या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. सरसंघचालकांनी विराट हिंदू संमेलनानंतर तलासरी येथील ५० वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रकल्पाला भेट दिली. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@