पुणे - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे आजही आपण बोलत असलेल्या हिंदू धर्मसुधारणेशी सुसंगतच आहेत. त्यांचे विचार व तळमळ आपण समजून घेतली तर आजच्या अनेक आव्हानांचा सामना आपण यशस्वीपणे करू शकतो, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे सहायक प्राध्यापक संजय तांबट यांनी केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त विश्व संवाद केंद्राच्या वतीने केशव सभागृह, मोतीबाग येथे डॉक्टर आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता" या विषयावर प्रा. तांबट यांचे व्याख्यान झाले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह डॉ. मनमोहनजी वैद्य, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी व पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख दिलीप क्षीरसागर हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. तांबट म्हणाले, "लोकांशी सतत संवाद साधणे हा पत्रकारितेचा गाभा आहे. या निकषावर बाबासाहेबांची पत्रकारिता उठून दिसते. बहुजन समाजाच्या वृत्तपत्रांनीही अस्पृश्यांची फारशी दखल घेतलेली नाही, असे बाबासाहेबांनी म्हटले होते आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी वृत्तपत्रे काढली. अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत त्यांनी 'मूकनायक' हे नियतकालिक चालवले, मात्र संपादक म्हणून पाडुंरंग भटकर यांची त्यांनी संपादकपदी नियुक्ती केली. संपादक म्हणून बाबासाहेबांचे नाव पुढे 'बहिष्कृत भारता'वर आले. बाबासाहेबांची पत्रकारीता खऱ्या अर्थाने 'बहिष्कृत भारता'त दिसून येते. बाबासाहेबांचा युक्तिवाद बिनतोड होता. बाबासाहेबांची कळकळ आपल्याला समजून घ्यावी लागेल तरच आजची आव्हाने सोडवता येतील.'
बाबासाहेबांचे विचार समजायचे असतील तर 'बहिष्कृत भारता'चे अग्रलेख आपल्याला अभ्यासावे लागतील. दलित तरुणांचा आक्रोश आपल्याला समजून घ्यावा लागेल. स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्त्वे बाबासाहेबांनी इथल्या भूमीतून व बौद्ध विचारातून घेतली. ती त्यांनी बाहेरून कुठूनही घेतलेली नाही, हे त्यांनी स्वतः सांगितले असल्याचेही श्री. तांबट यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रास्ताविक करताना श्री. कुलकर्णी म्हणाले, की विश्व संवाद केंद्राची सुरुवात चार वर्षांपूर्वी झाली. प्रसारमाध्यमांशी संपर्क साधणे हे विश्व संवाद केंद्राचे प्रमुख काम असून त्यात बऱ्यापैकी प्रगती झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. प्रबोधनाचा एक मार्ग म्हणून बाबासाहेबांनी नियतकालिकांचा उपयोग केला. म्हणून यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या पत्रकारितेवर हे भाषण आयोजित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. आसावरी जोशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले