औरंगाबाद : आपल्या चिमुकलीच्या पहिल्या वाढदिवसाची मोठ्ठी बर्थडे पार्टी न देता, शहरापासून दूर, डोंगराळ वस्तींत राहणाऱ्या वनवासी बांधवांसह वाढदिवस साजरा करण्याची कल्पना सुचली औरंगाबाद येथील तोष्णीवाल दाम्पत्याला. औरंगाबाद शहरात नुकतेच स्थायीक झालेले रक्ताचे कर्करोग तज्ञ डॉ.मनोज तोष्णीवाल(एमडी,डीएम हिमॅटॉलॉजी) व त्यांची पत्नी डॉ.श्वेता तोष्णीवाल (एमडी.पॅथॉलॉजी)यांनी आपल्या मूलीचा पहीला वाढदिवस सध्या प्रचलित असलेल्या पद्धतीने न करता मी समाजाचे काही देणे लागतो या हेतूने करायचा विचार केला.
औरंगाबाद शहरापासून १२ कि.मी.अतंरावर असलेल्या जोगवाडा गावामध्ये असलेल्या १२ घरांच्या(झोपडी) भिल्ल बांधवाच्या वस्तीवर हा वाढदिवस साजरा केला. खरं तर अजूनही आपले दुर्देव असे की तेथील भिल्ल समाजाच्या लोकांना अजूनही राहण्यासाठी घर नाही, की अजूनही झोपडीत वीजेची सोय नाही. जवळच असलेल्या वीट भट्टीवर मोल मजूरी करून आपला उदर निर्वाह भागवणारे हे लोक. या वस्तीवर जाऊन तोष्णीवाल कुटुंबीयांनी सर्व वस्तीवरील असलेल्या सत्तावीस मुलां-मुलींना एकत्र केले व त्यांच्यासाठी नवीन कपडे व खाऊ वाटप केला.याच बरोबर डॉक्टरांनी वस्तीतील सर्वांबरोबर स्वच्छता व आपले आरोग्य या विषयावर संवाद साधला.
महाएमटीबी सोबत संवाद साधताना त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांनी देखील येथील वंचित लोक पाहून मनात त्यांच्यासाठी काम करण्याची इच्छा जागृत होत असे, मुलीच्या वाढदिवसानिमित्त ती इच्छा पूर्ण केली. माझ्या एकट्याच्या या प्रयत्नाने खूप मोठा बदल घडणार नाही, मात्र याची सुरुवात मी स्वत:पासून करण्याचा निश्चय केला आहे. माझ्या चिमुकलीला देखील लहानपणापासून ही सवय जडल्यास ती देखील आयुष्यात हे संस्कार विसरणार नाही. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.