आजपासून बेस्टचा प्रवास महागणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
मुंबई : आर्थिक संकटात असल्यामुळे बेस्टच्या तिकीटदरामध्ये वाढ करण्यात आली असून आजपासून ही दरवाढ लागू होणार आहे त्यामुळे आता बेस्टचा प्रवास महागणार आहे. बेस्टची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुचवण्यात आलेल्या भाडेवाडीला स्थायी समिती, पालिका सभागृहाच्या मंजुरीनंतर आता मुंबई मेट्रोपोलिटन रिजन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (एमएमआरटीए)ची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भाडेवाडीचा मार्ग मोकळा झाला होता. या भाडेवाढीत पहिल्या दोन टप्प्यामध्ये कोणतीही वाढ झाली नसून त्यानंतर एक रुपयापासून ११ रुपयांपर्यंतही वाढ होणार आहे. त्याचबरोबर बेस्ट बस पास दरातही वाढ होणार आहे.
 
बेस्ट गेल्या काही वर्षात आर्थिक संकटात सापडली असून बेस्टला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पालिका आयुक्तांनी कृती आरखडा बेस्टला दिला आहे. त्यामध्ये तिकीटांची दरवाढ सुचवली होती. बेस्ट समितीने या दरवाढीला मंजुरी दिली आहे. या दरवाढीनुसार पहिल्या दोन टप्प्यामध्ये कोणतीही वाढ झाली नसून त्यानंतर एक रुपयापासून ११ रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. बेस्टच्या दैनंदिन बस पासमध्येही ७० ते ९० रुपयांची वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या बसपासमध्ये ५० रुपयांची वाढ झाली आहे. एसी बसच्या तिकीटांत किमान ५ रुपयांची वाढ झाली आहे. बेस्टने काही दिवसांपूर्वीच बोरीवली, ठाणे, मुलुंड आणि खारघर ते वांद्रे-कुर्ला संकुलादरम्यान सुरू केलेल्या बसच्या तिकीटांमध्येही वाढ करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीत व पालिका सभागृहात मंजूर झाला आहे.
 
बेस्टची दरवाढ करताना मुंबई मेट्रोपोलिटन रिजन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (एमएमआरटीए)ची मंजुरी आवश्यक असते. बुधवारी ट्रान्सपोर्ट अथॉरिटीच्या बैठकीत बेस्टच्या दरवाढ प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यामुळे आजपासून बेस्टची दरवाढ लागू करण्यात आली आहे. दैनंदिन बसपास शहरासाठी ५० रुपये, उपनगरासाठी ६० रुपये तर सर्वत्र मुंबईसाठी ९० रुपये असा असेल. जेष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलतीच्या योजनेची अंमलबजावणी होईपर्यंत एसी बससेवा वगळता मासिक बसपासामध्ये ५० रुपये तर त्रैमासिक बसपासमध्ये २०० रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. तसेच सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान दैनंदिन बसपासमध्ये असलेली ५० टक्के सवलतीची आनंदयात्री योजना रद्द करण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@