‘स्त्री अस्मितेची नवी साद’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018
Total Views |

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विधानभवनातही स्त्री-शक्तीचा जागर
‘अस्मिता’ योजनेतून महिलांचा संकोच दूर होईल, मान्यवरांचा विश्वास
 

 
 
मुंबई : महिलांची मासिक पाळी, सॅनिटरी पॅड याबाबत असलेला संकोच दूर होणे गरजेचे आहे. महिलांना मासिक पाळीच्या काळात ४ दिवसांसाठी वर्षानुवर्षे उंबरठ्याच्या आत डांबण्यात आले. आता ग्रामविकास विभागाच्या 'अस्मिता'सारख्या योजनेतून या विषयावर किमान चर्चा होत आहे.
 
मासिक पाळी, सॅनिटर पॅड यांसारख्या विषयावर महिलांना विनासंकोच बोलता आले पाहीजे. अस्मिता योजनेतून हे निश्चितच साध्य होईल, असा विश्वास विधानभवनातील पत्रकार कक्षात झालेल्या विविध क्षेत्रातील अग्रगण्य महिलांच्या चर्चेत व्यक्त करण्यात आला.
 
मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ आणि राज्य शासनाच्या महिला - बालविकास विभागामार्फत ‘स्त्री अस्मितेची नवी साद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेत महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड, चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, दै. पुण्यनगरीच्या समुह संपादक राही भिडे, सहाय्यक पोलीस आयुक्त वनिता पाटील, माटुंगा रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तर ममता कुलकर्णी यांच्यासह महिला आमदार, महिला अधिकारी आणि उपस्थित पत्रकारांनी सहभाग घेतला.
 
 
पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, ग्रामीण मुलींना फक्त ५ रुपयांत ८ सॅनिटरी पॅड देणे हे अस्मिता योजनेचे उद्दीष्ट तर आहेच, पण त्याचबरोबर यासंदर्भातील लज्जा, संकोच दूर करण्यासाठी प्रबोधनावरही भर देण्यात येणार आहे. भविष्यात सॅनिटरी पॅडचा दर आणखी कमी करण्यात येईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही अस्मिता बाजार निर्माण करीत आहोत. कचऱ्याचे व्यवस्थापन करुन खत निर्मितीसारख्या उद्योगात महिलांना प्रोत्साहन देण्यात येईल. अशिक्षित महिलांनीही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे गरजेचे असून त्यासाठी अस्मिता बाजार योजनेतून व्यापक उपाययोजना राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
 
आपल्याकडे एकीच्या भावनेची फार कमतरता असल्याची खंत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केली. महिलांच्या प्रश्नावर काम करतानाही ही एकीची भावना आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. फक्त ५ रुपयांत ८ सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देणारी अस्मिता योजना फारच क्रांतिकारी असून महिला आणि मुलींसाठी ती वरदान ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
वनिता पाटील यावेळी म्हणाल्या की, मासिक पाळीसारख्या विषयावर ग्रामीण भागातील मुलींना आजही आईशीसुद्धा बोलताना संकोच वाटतो. बऱ्याच मुलींना मग एखाद्या मैत्रिणीशी बोलावे लागते. या विषयावर चर्चाच होत नसल्याने मुली आणि महिलांमध्ये त्याबाबत मोठे अज्ञान आहे. अस्मितासारख्या योजनेतून हे अज्ञान दूर होईल. त्याबरोबरच मुलींचा आत्मविश्वासही वाढेल, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार स्नेहलता कोल्हे, मंदा म्हात्रे, भारती लव्हेकर, विद्या चव्हाण, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी, संगिता ठोंबरे, मनिषा चौधरी, हुस्नबानो खलिफे, माधुरी मिसाळ आदी उपस्थित होत्या.
 
@@AUTHORINFO_V1@@