आणीबाणी काळातील सत्याग्रहींना निवृत्तीवेतन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018
Total Views |

वेतनाची रक्कम या महिन्याखेर निश्चित करू, महसूलमंत्र्यांचे आश्वासन

 
 

  
 
मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीच्या काळात लोकशाही टिकवण्यासाठी लढा देऊन १ महिन्यापेक्षा अधिक बंदीवास सोसलेल्या सर्व सत्याग्रहींना निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निवृत्तीवेतनाच्या रकमेची आकडेवारी या महिन्याअखेर निश्चित करण्यात येईल, असे महसूल तसेच मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
आणीबाणीतील सत्याग्रहींना निवृत्तीवेतन देण्याच्या निर्णयाबाबत विधानसभेत केलेल्या निवेदनात चंद्रकांत पाटील म्हणाले की, १९७५ ते १९७७ या कालावधीत देशात आणीबाणीच्या कालावधीत बंदीवास सोसलेल्या सर्व सत्याग्रहींचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने त्यांना निवृत्तीवेतन (पेन्शन) देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी मंत्री मंडळ उपसमिती नियुक्त करण्यात आली असून समितीने बंदीवासाच्या कालावधीनुसार द्यायच्या पेन्शनबाबतच्या निर्णय घेतले आहेत. अन्य राज्यामध्ये पाच-दहा वर्षापूर्वीच अशाप्रकारे कारावासात राहिलेल्या व्यक्तींना पेन्शन सुरू झाली आहे. महाराष्ट्रातही अशी पेन्शन योजना सुरू व्हावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार अशा सत्याग्रहींना पेन्शन देण्याचे निश्चित केले आहे. या निर्णयानुसार एक ते सहा महिने कालावधीमध्ये ज्यांना तुरुंगवास झाला त्यांना देण्यात येणारी रक्कम वेगळी आणि सहा महिन्यापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिलेल्या सत्याग्रहींसाठी वेगळी रक्कम देण्यात येणार असून रकमेची आकडेवारी या महिन्याअखेर निश्चित करण्यात येईल, असे ते म्हणाले.
 
 
 
 
आणीबाणीकाळातील या संघर्षामुळे तुरुंगात राहिलेल्या ज्या सत्याग्रहींचे निधन झाले आहे, त्यापैकी सत्याग्रही पुरुषाच्या निधनोत्तर त्याच्या पत्नीला आणि सत्याग्रही महिलेच्या निधनोत्तर तिच्या पतीला ही पेन्शन देण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी नमूद केले. तसेच सर्व पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी या महिनाअखेरपर्यंत यासंबंधी सर्व माहिती गोळा करून वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
@@AUTHORINFO_V1@@