भयगंडाने झपाटलेल्या ममता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2018
Total Views |



 

संघ-भाजप बंगालमध्ये जातीय तणाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत असून अशा लोकांना शोधून आणण्यासाठी जे नागरिक मदत करतील त्यांना सरकार रोख रक्कम किंवा सरकारी नोकरीत सहभागी करून घेणार आहे. नुसती माहिती देण्यासाठी इतके मोठी रक्कम देणारे हे पहिलेच सरकार असावे. ममतांचा भयगंड यासाठी कारणीभूत आहे.
 
 

शान्य भारतातील भारतीय जनता पक्षाचा विजय जसापक्षम्हणून महत्त्वाचा आहे, तसाच तो राजकीय घटनाक्रमातही महत्त्वाचा मानावा लागेल. संघ भाजपमध्ये या निकालामुळे चैतन्य आले असले तरी राजकीय पटलावर त्याच्या उमटणार्‍या प्रतिक्रिया टिपणे औचित्याचे आहे. सुनील देवधर त्यांच्या चमूने त्रिपुरात मारलेली मुसंडी लक्षणीयच! भाषा, भौगोलिक परिस्थिती या सगळ्यावर मात करून देवधरांनी तिथे भाजपला विजयाची वाट दाखविली. त्रिपुरातील यशानंतर एक व्यक्ती सातत्याने या विषयी प्रतिक्रिया देत आहे. ही व्यक्ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असल्याने त्या कोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ शकतात, याची पुरेपूर कल्पना येऊच शकते.

 
राजकारणात काहीही सरळ नसते. एखादा राजकीय नेता अभिव्यक्त होतो, तेव्हा त्याच्या अंतर्मनात काय सुरू आहे, त्याचेच हे प्रतिबिंब असते. आपल्या पहिल्याच प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले होते की, ‘‘हा भाजपचा विजयच नाही. त्रिपुरातील माणिक सरकार भोवताली इतके घडत असताना ढिम्म होते. संघ आणि भाजपने बाहेरून माणूस आणला आणि त्याने त्रिपुरा जिंकले.’’ या पहिल्या प्रतिक्रियेनंतर आजतागायत त्यांच्या ज्या ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्या ममता बॅनर्जींच्या खुर्चीला बसू लागलेल्या हादर्‍यांचे प्रतिबिंबच मानावे लागेल. कालचे त्यांचे नवे विधानही अशाच आशयाचे आहे. त्यांच्या आक्रस्ताळी स्वभावाला अनुसरून ममतांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. बर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूर येथे त्यांनी प्रशासनाला कारवाईचे आदेश देताना एक नवी योजनादेखील मांडली. त्यांच्या योजनेचा गाभाच मुळी संघ आणि भाजप द्वेषावर अवलंबलेला आहे. रा. स्व. संघ आणि भाजप स्थानिक तरुणांना जातीय दंगे घडविण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. संघाचे लोक अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांमध्ये मांसाचे तुकडे फेकण्यासाठी पैसे देत आहेत. त्यामुळे जातीय तणाव वाढत असल्याचा दावा ममताबाई करतात. हाबरा येथे असे करणार्‍या संघाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आता या अंधेर नगरीत कोणाला अटक केली गेली आहे? कोणत्या आरोपाखाली अटक केली गेली आहे? हे कोणीही सांगू शकत नाही. खुद्द राज्यकर्त्याचा दृष्टिकोन इतका दूषित असेल तर खाली प्रशासन कसे वागत असेल हे सांगायला वेगळ्या प्रकारच्या तपशीलांची गरज नाही. या पुढे जाऊन ममतांनी पोलिसांना आदेश दिले आहेत की, त्यांनी अशा गावागावांमध्ये समित्या स्थापन कराव्या. जातीय तेढ निर्माण करण्याचे काम जर कुणी करीत असले तर त्यांची माहिती देणार्‍यांना रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस द्यावे किंवा त्यांना सरकारी नोकरीत सामावून घ्यावे. नुसती माहिती देण्यासाठी इतके भारी इनाम देणारे पश्चिम बंगाल हे जगातील एकमेव सरकार असावे. मुळात इनामाची ही किंमत माहितीची नाही, तर ती ममता बॅनर्जींच्या भयगंडाची आहे. जे ईशान्य भारतात सुरू आहे ते बंगलामध्ये घडण्यास उशीर लागणार नाही. याची पुरेपुर कल्पना ममतांना आहे. मात्र, त्यांचा स्वभाव इतका आक्रस्ताळी आहे की जे त्या करतात शेवटी त्या त्यातच जाऊन फसतात.
 
ममता मूळच्या काँग्रेसच्या. काँग्रेसपासून फारकत घेत त्यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. ‘राष्ट्रीय पक्षम्हणून काँग्रेसचे जे काही पायाभूत संघटन होते, ते त्यांनी जाताना स्वत:बरोबर नेले. खुनशी आणि थंड डोक्याने हिंसा करणार्‍या डाव्यांशी त्यांनी खुलेपणाने पंगा घेतला आणि पश्चिम बंगालची सत्ता ताब्यात घेतली. ममतांच्या या कर्तृत्वाचे सार्‍या देशाने मोठ्या कुतूहलाने स्वागतच केले. मात्र, सत्तेत आपले पाय घट्ट रोवण्यासाठी काँग्रेसचाच जुना डाव खेळायला त्यांनी पुन्हा सुरुवात केली. मुस्लिमांचे लांगूलचालन हा त्यातला प्रमुख भाग. नव्वदीच्या दशकात काँग्रेस जे दाढ्या कुरवाळण्याचे उद्योग करायची, तेच उद्योग ममता आज पश्चिम बंगालमध्ये करीत आहेत. मुस्लिमांची एकगठ्ठा मते स्वत:च्या ताब्यात ठेवली की, सत्तेची चावी आपल्या हाती राहील असा त्यांचा काँग्रेसी समज आहे. या समजाला सध्याच्या भाजपने केव्हाच सुरूंग लावला आहे. उत्तर प्रदेशात त्याचा ट्रेलर सार्‍या देशाने पाहिला आहे. 
 
पश्चिम बंगाल विचारांनीडावाअसला तरी त्याचे जनमानस अत्यंत उत्सवी आहे. दुर्गापूजा हा तर बंगाली जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. मागील वर्षी दुर्गापूजेच्या निमित्ताने कोलकात्यात जे घडले, ते बंगाली जनता अद्याप विसरू शकलेली नाही. मुस्लीम धर्मांधांना ममतांनी इतके गोंजारले आहे की, ते कोणत्याही क्षणी हिंसाचाराला तयार होतात. मेल टुडेया युकेस्थित माध्यम समूहाने गेल्या वर्षी एक लेख प्रकाशित केला आहे. त्याचे शीर्षकचममता बॅनर्जींनी लांगूलचालनाच्या माध्यमातून बंगालचे सामाजिक सौहार्द कसे बरबाद केले,’ अशा आशयाचे आहे. मुस्लिमांनी हल्ले केले की, पोलीस गप्प राहातात आणि प्रतिकार करायला लागले की, पोलीस येऊन ताब्यात घ्यायला लागतात. अशी बंगालमधील काही जिल्ह्यातील स्थिती आहे. खुद्द कोलकाता उच्च न्यायालयाने या तुष्टीकरणासाठी ममता बॅनर्जी सरकारची कानउघडणी केली आहे.
 
या सार्‍याचा परिणाम म्हणजे मुक्त माध्यमांवर आजही कुठल्या तरी गावगन्ना मुल्ला मौलवीचे देशाच्या पंतप्रधानांना आव्हान देणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. अशिक्षित मुसलमानांना तुम्ही कसे असुरक्षित आहात, हे चिथावून सांगण्याचा खेळ पश्चिम बंगालच्या मुस्लीमबहुल तालुक्यांमध्ये राजरोसपणे सुरू आहे. या सार्‍याच्या विरोधात बंगालमध्ये असंतोष खदखदतच आहे. ईशान्येकडच्या राज्यांवर बंगालचा प्रभाव नाकारता येत नाही. मात्र, तिथे राजकीयदृष्ट्या जे घडते आहे, त्याचा परिणाम बंगालवरही पडू शकतो. बंगालसह ईशान्येकडच्या राज्यांना भाजप उत्तरेकडचा पक्ष वाटायचा. ईशान्य भारतात जे काही घडत आहे त्याचा परिणाम इथल्या राजकारणावर होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पुढील काही काळात ममतांचा थयथयाट वाढतच जाईल. घोडामैदान दूर नाही. बंगालच्या निवडणुकांना अद्याप अवकाश असला तरी आपल्या आक्रस्ताळी स्वभावाने ममताच या राजकारणात रंग भरतील.
@@AUTHORINFO_V1@@