वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी खान्देशात १० पोलिस ठाणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2018
Total Views |

राज्यभरातील १३२ ठाण्यांचा समावेश


 
जळगाव :
राज्यात वीज चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्रात १३२ पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे. यातील १० पोलीस ठाणी खान्देशात आहेत.
 
 
या संदर्भातील एक परिपत्रक गृह विभागाने २८ फेब्रुवारी रोजी जारी केले आहे. या १३२ पोलीस ठाण्यांमध्ये महावितरण, अधिकृत फ्रेंजाईजी वितरण किंवा वितरण परवानाधारक यांच्याशी चोरी संदर्भात घडलेल्या गुन्ह्यांशी संबंधित प्रथम खबरी अहवाल दाखल करता येईल.
 
 
साधारणत: प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करता येणार आहेत. मोठ्या शहरांमध्ये पाच पोलीस ठाण्यांना वीज चोरीबाबतचे गुन्हे दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीचे महावितरणची सहा पोलीस ठाणी बंद करण्यात आली आहेत. वीज चोरीच्या माध्यमातून सुमारे १० टक्के वितरण हानी होत आहे. याबाबत राज्य सरकारनेही कडक भूमिका घेतली आहे.
 
खान्देशात जळगाव जिल्ह्यात ४, नंदूरबार ३ आणि धुळेमध्ये ३ पोलीस ठाण्यांना मंजुरी मिळाली आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांपैकी अहमदनगरमध्ये ४, औरंगाबाद ५, बीड ४, ठाणे १०, हिंगोली ३, नांदेड ४, नाशिक ५, जालना ३, परभणी ३, उस्मानाबाद ३, लातूर ३, नागपूर शहर व ग्रामीण मिळून ७, पुणे शहर व ग्रामीण मिळून ७, सोलापूर ४, अकोला ३, अमरावती ४, भंडारा २, बुलढाणा २, चंद्रपूर ३, गडचिरोली २, गोंदिया ३, कोल्हापूर २, पालघर ६, रायगड ४, रत्नागिरी २, सांगली ३, सातारा ३, सिंधुदूर्ग २, वर्धा २, वाशिम ३, यवतमाळ ४, मुंबई शहर व उपनगरात ७ पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करता येणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@