कोलंबो : आज भारत आणि श्रीलंका यांच्यात होणारा टी-२० सामना हा वेळेप्रमाणेच होणार असे स्पष्ट करण्यात आले आहे. आजपासून सुरु होणाऱ्या भारत, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ काल श्रीलंकेला पोहोचला. मात्र श्रीलंकेमध्ये मुस्लीम आणि बौद्ध धर्मियांचा वाद वाढू नये म्हणून श्रीलंकेमध्ये आजपासून १० दिवसांची आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
मात्र या आणीबाणीच्या स्थितीत देखील आज भारत आणि श्रीलंका यांच्यात होणारा टी-२० सामना होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या आणीबाणीचा परिणाम या क्रिकेट सामन्यांवर होणार नाही असे देखील सांगण्यात आले आहे. कोलंबोमध्ये हे सगळे सामने खेळले जाणार आहेत. आज कोलंबोमधील आर. प्रेमदासा मैदानावर भारत विरुद्ध श्रीलंका हा सामना खेळला जाणार आहे. निदास ट्रॉफीसाठी हा सामना तीन संघांमध्ये खेळला जाणार आहे.
भारत श्रीलंका आणि बांगलादेश हे एकमेकांसोबत एकूण सहा सामने खेळणार आहेत आणि या मालिकेतील शेवटचा सामना १८ मार्चला खेळला जाणार आहे. या शेवटच्या सामन्यात जो संघ जिंकेल तो या मालिकेचा विजेता ठरणार आहे.
मुस्लीम आणि बौद्ध धर्मियांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही आणीबाणी आजपासून लागू करण्यात आली आहे. देशात शांततेचे वातावरण राहावे तसेच हिंसक हालचालींना खतपाणी मिळू नये यासाठी ही आणीबाणी लागू करण्यात आली आहे.