प्राचार्यपदी निवड झाल्यानंतर मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, “ज्ञानदानाच्या कार्यात मला सुरुवातीपासून रस होता. १९९५ साली या संस्थेत मी कायम झाले. बी.एड्. मधील मुलींना शिकवण्यात आनंद मिळायचा कारण त्या भावी शिक्षिका होत्या. ज्या पद्धतीने मी विज्ञान शिकवायचे त्यात विद्यार्थिनींशी सुसंवाद व्हायचा. प्राचार्य होण्यापर्यंतचा हा प्रवास खडतर होता. माझ्या मुलांचा सांभाळ आणि नोकरी यात धावपळ व्हायची. नवी आव्हाने होती पण या कामाचा आनंद घेतला. या सगळ्यात विद्यार्थिनींनी यश मिळवलेले ते पाहून अजून आनंद व्हायचा.’’
“बी.एड्. महाविद्यालयांची अवस्था सध्या बिकट आहे. आधीच्या सरकारने असंख्य बी.एड्. महाविद्यालयांना परवानग्या दिल्या. या महाविद्यालयांची पायाभूत सुविधा, दर्जा तसेच समाजाला डी.एड्.च्या विद्यार्थ्यांची गरज किती आहे यांचा विचार न करता या महाविद्यालयांना परवानग्या दिल्या. त्याचा परिणामबी.एड्. वर झाला आहे. या संदर्भात काय करता येईल तसेच १२ वीच्या पुढच्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो तर त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचा दर्जा मिळावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न असेल आमचा.”
- प्रा. आ. मेधा कुलकर्णी