डॉ. आचार्य ‘अविनाशी सेवा’ पुरस्कार वितरण आज केशवस्मृती सेवासंस्था समूह, जळगाव जनता सह. बँक आयोजित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2018
Total Views |
 
 
डॉ. आचार्य ‘अविनाशी सेवा’ पुरस्कार वितरण आज
केशवस्मृती सेवासंस्था समूह, जळगाव जनता सह. बँक आयोजित
जळगाव, २७ फेब्रुवारी
केशवस्मृती सेवासंस्था समूह आणि जळगाव जनता सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. डॉ. अविनाश आचार्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व खुले नाट्यगृहात होईल.
 
 
यावेळी प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे तर प्रमुख वक्ते औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे (डॉ. हेडगेवार रुग्णालय) सचिव डॉ. अनंत पंढरे असतील. समाजाप्रती समर्पित भावनेने केलेल्या सेवेबद्दल संस्था आणि व्यक्तिगत स्तरावर हा पुरस्कार देण्यात येतो. त्यांचे कार्य समाजासमोर यावे आणि इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून हा पुरस्कार दिला जातो. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
 
 
पुरस्कारार्थींचा परिचय
मीराताई कुळकर्णी
गेल्या २० वर्षापासून आसाममध्ये विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून मुलांचे शिक्षण, संस्कार, योगा आणि तरूणांमध्ये राष्ट्रभक्ती जागरणाचे कार्य करीत असलेल्या मूळ जळगाव येथील मीरा रघुनाथ कुळकर्णी यांना व्यक्तिगत स्तरावरील पुरस्कार दिला जाणार आहे. ५१ हजार रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरुप आहे. व्यक्तिगत स्तरावरील पुरस्कारासाठी मीरा रघुनाथ कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. १९९७ मध्ये त्यांचा विवेकानंद केंद्राशी संबंध आला आणि त्यांनी कार्य सुरू केले. प्रारंभ झाला तो अरूणाचल प्रदेशमधून. १९९८ मध्ये आसाममधील गोलाघाट येथे त्यांनी काम सुरू केले. बघता बघता त्या आसामी भाषा आणि संस्कृतीशी एकरूप झाल्या. विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांच्या सहयोगाने त्यांनी तेथे शाळांची संख्या ३ वरून २२ वर नेली आहे. तसेच कार्यकर्त्यांचीही फळी मजबूत केली. शिक्षणापासून वंचित असलेल्या चहामळ्यातील मजुरांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी आनंदालय ही संकल्पना रूजवली. येथे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण गुरू-शिष्य परंपरेनुसार दिले जाते.
 
 
दीनदयाल बहुद्देशीय प्रसारक मंडळ
संस्थात्मक पुरस्कारासाठी यवतमाळ येथील पारधी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी आणि आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी काम करणार्‍या दीनदयाल बहुद्देशीय प्रसारक मंडळाची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरुप १ लाख १ हजार रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे.
 
 
संस्थात्मक पातळीवर यावर्षी यवतमाळ येथील दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाची निवड करण्यात आली आहे. पारधी समाजाच्या सर्वांगिण विकास, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे संपूर्ण पुनर्वसन, शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय आणि कृषीक्षेत्राचा शाश्वत विकास हे प्रमुख उद्देश दृष्टीसमोर ठेवून १९९७ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली.
 
 
संस्थेद्वारे विवेकानंद छात्रावास, बालसंस्कार केंद्र, केशव आर रक्षक योजना, स्वयंरोजगार कार्यक्रम आणि पारधी समाजासाठी विकासात्मक उपक्रम राबविले जातात. कुटुंब आधार योजना, शैक्षणिक व शिष्यवृत्ती प्रकल्प, समुपदेशनासह शेतीविकासासाठीही अनेक उपक्रम राबविले जातात.
 
@@AUTHORINFO_V1@@