उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेचा १५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर घोटाळा उघडकीस आला आहे. शहरातील अनेक सभागृह, राष्ट्रीय व स्थानिक बँकांच्या शाखा, मोबाईल टॉवर्स, एटीएम यांबाबत चुकीची माहिती देऊन मालमत्ताधारकांनी मनपाची फसवणूक केली होती. मनपाचे विशेष करनिरीक्षक विजय मंगलानी यांच्या पथकाने हा घोटाळा उघडकीस आणला आहे.
मार्च महिना संपण्याच्या मार्गावर असून, मनपाच्या मालमत्ता विभागाच्या दृष्टीने हे आर्थिक वर्ष संपत आहे. ही बाब लक्षात घेऊन मनपाच्या मालमत्ता विभागाने कर वसूलीसाठी कंबर कसली आहे. दि. २३ मार्च रोजी मालमत्ता विभागाने तब्बल ८३ लाख रुपये वसूल केले होते तर दि. २८ मार्च रोजी ३३ लाख रुपये वसूल केले होते, दरम्यानच्या काळात विशेष करनिरीक्षक विजय मंगलानी आणि मालमत्ता कर विभागाचे कर्मचारी हासा जयसिंघानी, सुरेश कृपलानी यांनी मनपाच्या हद्दीतील विविध बँकांच्या शाखा, मोबाईल टॉवर्स, एटीएम, सभागृह, राजकीय नेत्यांचे बंगले यांच्यावर लक्ष केंद्रित केले असता, अनेक मालमत्ता पत्र्यांच्या छताचे दाखवण्यात आले मात्र, प्रत्यक्षात त्या ठिकाणी ५ मजल्यांची इमारत उभी आहे असे दिसून आले, बँका व मालमत्ताधारक यांच्यात झालेल्या भाडेतत्वाच्या कारारामध्ये काही हजार रुपयांचे भाडे दाखवण्यात आले होते, प्रत्यक्षात मात्र लाखो रुपयांचे भाडे आकारण्यात येत होते. या कराराची नोंदणी महानगरपालिकेत करणे आवश्यक आहे. मात्र, त्याची नोंदणीच करण्यात आली नव्हती.
अनेक मोबाईल टॉवर्स आणि सभागृहांची देखील नोंदणी महानगरपालिकेत झाली नव्हती. मात्र, मालमत्ताधारक त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल करीत होते. या मालमत्ताधारकांमध्ये राजकीय नेते व काही विद्यमान नगरसेवकांचा देखील समावेश आहे, अशा सर्व मालमत्ताधारकांना नोटीस आणि कायदेशीर कारवाई करून १५ करोड रुपयांचा मालमत्ताकर घोटाळा मालमत्ता विभागाने उघडकीस आणल्याची माहिती विजय मंगलानी यांनी दिली असून तत्कालीन मनपा आयुक्त राजेंद्र निंबाळकर, मालमत्ता कर उपायुक्त दादा पाटील, सहाय्यक लेखाधिकारी संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनामुळेच मालमत्ता विभागाला अशी भरीव कामगिरी करता आली असे मंगलानी यांनी सांगितले.