केंद्रीय अवजड उद्योग मंत्री बाबुल सुप्रियो, यांना पश्चिम बंगालमधील असनसोल-राणीगंज भागातील दंगलग्रस्तांच्या भेटी घेण्यापासून रोखण्यात आले. रामनवमी नंतर घडलेल्या दंगलीनंतर दंगलग्रस्तांच्या भेटीसाठी ते राणीगंज भागात गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांना भेट घेण्यापासून रोखले.
त्याचबरोबर इतर भाजप पदाधिकाऱ्यांना देखील दंगलग्रस्त लोकांच्या भेटी घेऊ दिल्या नाहीत, त्याउलट त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार नोंदवली आहे. बाबुल सुप्रियो यांनी आपल्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी आपल्याला भेटी पासून तर रोखलेच, त्याचबरोबर मला भेटायला येणाऱ्या दंगलग्रस्तांवर देखील लाठीचार्ज केला असल्याची माहिती त्यांनी दिली.
यासंबंधीच व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. पश्चिम बंगाल सरकारने सामान्य जनतेशी एवढे निर्दयीपणे वागू नये. पोलिसांनी लाठीचार्ज करताना किमान महिलांचा तरी विचार करायला हवा होता, असा खेद त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.