मुंबईकरांची दूषित पाण्यापासून होणार सुटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2018
Total Views |



 

 
सेंद्रीय प्रक्रियेने दहा मिनिटांत मिळणार स्वच्छ पाणी

योगीराज दाभाडकर यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई : मुंबईकरांची आता दूषित पाण्यापासून सुटका होणार असून, सेंद्रीय प्रक्रियेने दहा मिनिटांत स्वच्छ पाणी मिळणार आहे. मनपाच्या के (पश्चिम)विभागाचे प्रभाग समितीचे अध्यक्ष, भाजपचे नगरसेवक योगीराज दाभाडकर यांनी गटारातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करून ते स्वच्छ करून दाखवले आहे. मुंबईचा पाणीप्रश्न हा एक ज्वलंत विषय असून आणि तो सोडवणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने जर आपण अशा पद्धतीने वापरलेले पाणी ऑरगॅनिक फिल्टर वापरून ते टॉयलेट फ्लश, गार्डनिंग, कपडे-भांडी धुण्याकरता वापरू शकतो. योगीराज दाभाडकर यांच्या मनपा के-वेस्ट वॉर्डमधील दालनात गटारातील खराब झालेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रयोग करण्यात आला. यावेळी स्ट्रॉमवॉटर ड्रेनेजचे सहाय्यक अभियंता अनिल मेस्त्री, वर्सोवा पंपिंग स्टेशनचे असिस्टण्ट इंजिनिअर सा.ज.खर्डे, पर्यावरण विभागाचे सहाय्यक अभियंता महेंद्र कांबळे, सहाय्यक विश्लेषक मंगेश हळदणकर, दुय्यम अभियंता पश्चिम उपनगर रमेश मुरारी, मलनिस्सारण प्रचलनाचे सहाय्यक अभियंता वि. द. कुलकर्णी, मुंबई मलनिस्सारण प्रकल्प दुय्यम अभियंता विशाल लाटे, जल विभाग दुय्यम अभियंता विपुल बागडे उपस्थित होते. हा प्रयोग आणि पाण्याच्या शुद्धतेबद्दल बोलताना सहाय्यक विश्लेषक मंगेश हळदणकर म्हणाले की, के पश्चिम प्रभाग समितीच्या कार्यालयात सादर केलेल्या सांडपाण्याच्या प्रयोगातून पाण्याचे नमुने जी-उत्तर येथील म्युनिसिपल लॅबमध्ये तपासणीकरिता पाठवण्यात यावेत आणि अहवाल तपासूनच पडताळणी करावी. या अशा अभिनव प्रयोगाने आपण पुन्हा एकदा मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देऊ शकतो. सध्या केपश्चिम वॉर्डमध्ये दररोज सुमारे २५ कोटी लिटर्स इतके पाणी पुरवले जाते. त्यापैकी जवळपास आठ ते दहा कोटी लिटर्स पाणी गळतीमधून वाया जाते. परिणामी बर्‍याचशा भागात आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा होत नाही. मुंबईतील दूषित तसेच गटाराचे पाणी बर्‍याच ठिकाणी कुठलीही प्रक्रिया न करता, तसेच समुद्रात सोडले जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात समुद्राचे जलप्रदूषण होते. जर अशा प्रकारे सेंद्रीय प्रक्रिया करून पाणी सोडले तर निश्चितच मुंबई व त्यासभोवतालचा समुद्र प्रदूषणमुक्त होईल, असा विश्वास दाभाडकर यांनी व्यक्त केला.

समुद्री प्रदूषण १०० टक्के संपवता येईल

आम्ही प्रभाग क्रमांक ६० मधल्या सांडपाण्याच्या मोगरा नाल्यातील पाण्याचे नमुने घेऊन सेंद्रीय प्रक्रिया करून, दहा मिनिटांत पाणी स्वच्छ करण्यात यश मिळवले आहे. पुढील काही दिवसांत हा प्रायोगिग तत्वावर प्रकल्प म्हणून मोगरा नाल्यावर यशस्वीरीत्या पार पाडणार आहोत. त्या अनुषंगाने मोगरा नाल्यात वाहून येणारे फ्लोटिंग मटेरियल काढून त्या पाण्यावर सेंद्रीय प्रक्रिया करून त्यातील गाळ आणि शुद्ध पाणी हे दहा मिनिटांत वेगळे करून त्यातील गाळ बाजूला काढून शुद्ध पाणी समुद्रात सोडणार. जेणेकरून समुद्री प्रदूषण १०० टक्के संपवता येईल.

योगीराज दाभाडकर,

प्रभाग समिती, के पश्चिम
@@AUTHORINFO_V1@@