विरोधीपक्ष नेत्यांची सरकारवर टीका
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनातून राज्यातील जनतेची घोर निराशा झाली आहे. शेतकरी, बेरोजगारांना या अधिवेशनातून अपेक्षा होती, मात्र त्यांचीही निराशा झाली असून शिक्षक, अंगणवाडी सेविका, कंत्राटी कामगार, एमपीएससी विद्यार्थी, मराठा, धनगर, अल्पसंख्याक आरक्षण यातले कुठलेही प्रश्न सरकारला मार्गी लावता आलेले नसल्याची टीका विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. अधिवेशनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यपालांनीदेखील कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच गेल्या तीन अधिवेशनात घोषणा करण्यात आल्या मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यास आली नसल्याचे मुंडे म्हणाले.
भीमा कोरेगावचा प्रश्न हाताळण्यात सरकार आणि मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. न्यायालयीन चौकशी सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडे यांना क्लिन चीट कशी दिली? असा सवालदेखील त्यांनी यावेळी केला. मेक इन महाराष्ट्र आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र यातून किती रोजगार, गुंतवणूक आली? याबद्दलही सराकारने कोणतेही उत्तर दिलेले नाही. तसेच अश्विनी बिंद्रे प्रकरण विरोधकांनी लावून धरले त्यामुळेच कुरुंदकरला अटक झाल्याचे ते म्हणाले. येत्या २ तारखेपासून पुन्हा हल्लाबोल यात्रा सुरू करून सरकारला जागे करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही
दीड लाखाच्या कर्जमाफीसाठी पात्र झालेल्या शेकडो शेतकऱ्यांचे आपल्याला फोन आले. दीड लाखावरील कर्ज भरून कर्जमाफीचा लाभ घ्या अन्यथा १ एप्रिल पासून कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, असा मॅसेज बँकांनी दिला आहे. मात्र सरकारमधील एका मंत्र्यांचे कोट्यावधीचे कर्ज बँका काही लाखात सेटल करतात, यापेक्षा गंभीर गोष्ट नसल्याचे मुंडे यावेळी म्हणाले.