नाशिक : केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांची दिंडोरी लोकसभेचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील यांनी भेट घेतली. या भेटीत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाशिक येथून दिल्ली व कोलकाता येथे ’उडान योजने’अंतर्गत विमानसेवा सुरू करण्यात यावी यासाठीचे निवेदन दिले.
या निवेदनात नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, कांदा व डाळिंब शेती मोठ्या प्रमाणात आहे. द्राक्ष, कांदा व डाळिंब याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन असल्याकारणाने दिल्ली व कोलकाता येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यात येतात. तसेच शेतकर्यांनासुद्धा व्यापारासाठी थेट दिल्ली व कोलकाता या ठिकाणी ये-जा करावी लागते. तसेच नाशिक, दिंडोरी, सिन्नर येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहती असून तसेच निफाड येथे भविष्यातील ड्राय पोर्टची उभारणी होणार आहे. व्यापार, उद्योग, शेती या सर्व बाबींचा विचार करता, नाशिक येथून दिल्ली व कोलकाता येथे ’उडान योजने’अंतर्गत विमानसेवा सुरू करण्यात यावी. अशी सर्व माहिती खासदार हरिश्चंद्र चव्हाण व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील यांनी केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांना सांगितली.
यावेळी माननीय केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील यांना नाशिक -दिल्ली-नाशिक आणि नाशिक-कोलकाता-नाशिक या विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येतील, असे सांगितले.