मुंबई: अंधेरी येथील के (पश्चिम) वॉर्डमध्ये गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या परिसरामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून दूषिण पाण्याचा पुरवठा होत आहे. याप्रकरणी जल विभागाच्या अधिकार्यांकडे तक्रार करूनही तोडगा निघत नसल्याने प्रभाग ८४ चे नगरसेवक अभिजित सामंत आणि प्रभाग ७२ चे नगरसेवक पंकज यादव यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जल विभागाच्या उप जल अभियंता अ. सु. राठोड यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तसेच जोपर्यंत हे अधिकारी पाण्याचा प्रश्न सोडवत नाहीत तोपर्यंत येथून हलणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. अभिजित सामंत आणि पंकज यादव यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून ठिय्या मांडला. तसेच यावेळी नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यामध्ये श्रीकृष्ण आंबेकर, राजेंद्र सिंह, मिलिंद शिंदे, बबलू डोंगरे तसेच शेकडो स्थानिक रहिवाशांनी राठोड यांच्या के (पश्चिम) स्थित कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे. दरम्यान, या आंदोलनानंतर अधिकार्यांची तारांबळ उडाली आहे. काम करण्यासाठी धावपळ सुरू आहे. आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवू, असे अधिकार्यांनी सांगितले परंतु, विभागामध्ये समाधानकारक पाणीपुरवठा होईपर्यंत ‘ठिय्या आंदोलन’ चालूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
तक्रार करून फायदा नाही...
यापूर्वी १५ ते २० मिनिटे दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. त्यानंतर पाण्याचा दाब कमी व्हायला सुरूवात झाली. गेल्या तीन चार महिन्यांपासून ही समस्या स्थानिकांना सतावत आहे. याबाबत तक्रार दाखल करूनही प्रशासन दखल घेत नाही. त्यामुळे आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले असल्याचे नगरसेवक यादव यांनी सांगितले.