मुंबई : गांधी हत्येच्या प्रकरणात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव गोवण्याचा खोडसाळपणा काही लोक नेहमीच करत असतात. परंतु, रॉयल हिस्टरी सोसायटी ऑफ इंडिया, लंडन या संस्थेचे सदस्य आणि अभिनव भारत संस्थेचे विश्र्वस्त पंकज फडणीस यांनी याबाबत निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या वेबसाईटवर उपलब्ध एसएलपी (सी) ००८२९३ च्या २०१८ च्या अनुसार मी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सविस्तर निकालाचे पुनरावलोकन केले आहे, आणि त्यात मला सावरकरांच्या निर्दोषत्वाची माहिती मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंकड फडणीस म्हणाले की, ''महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात स्वा. सावरकरांना गोवण्याच्या खोट्या माहितीला नष्ट करण्याच्या प्रक्रियेला सुरू केल्याबद्दल न्यायालयाचे आभार व्यक्त करतो. महात्मा गांधींच्या हत्येसाठी वीर सावरकर जबाबदार होते, ही आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी खोटी माहिती सांगितली जाते. तथाकथित पुरोगामी कंपुने नेहमीच कपूर आयोगाच्या शेर्यांना धरून ठेवले आहे व त्याचा वापर एक पुरावा म्हणून सावरकर आणि त्यांच्या सहकार्यांच्या विरोधात केला आहे.''
सर्वोच्च न्यायालयाला या निर्णयात नेमके काय म्हणायचे
‘‘न्यायमित्रांनी नमूद केले आहे की, हे संशोधन वीर सावरकर यांच्या मृत्यूनंतर केले गेले आहे आणि सावरकरांना अथवा त्यांच्या प्रतिनिधींना बाजू मांडण्याची कोणतीही संधी देण्यात आलेली नाही. हा शोध चुकीचा आहे कारण सावरकरांची निर्दोष मुक्तता केली गेली होती. गोडसे आणि इतर मंडळी सावरकरांशी संबंधित असल्याच्या सर्वसाधारण निरीक्षणावरून हे अनुमान काढण्यात आले असून ते कुठल्याही प्रकारे सावरकरांच्या सुटकेच्या आड येत नाही हे नि:संशय.’’ सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सावरकरांविरूद्ध चाललेले षडयंत्र ताबडतोब थांबले पाहिजे, असे पंकज फडणीस यांनी म्हटले आहे.
फडणीस पुढे म्हणतात की, ''महात्मा गांधींची हत्या करणारा खरा माणूस शोधण्याचे कामअजून बाकी आहे. न्यायमित्रांच्या अहवालावर प्रतिक्रिया देण्याची परवानगी न्यायालयाने मला दिली होती, जे काम मी केले आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामध्ये या प्रतिक्रियेचा उल्लेख नाही. पण हा विषय नंतर पाहू.
आजचा दिवस तरी भारताचे एक थोर स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाला लागलेला कलंक दूर झाल्याबद्दल साजरा केला पाहिजे, असे म्हणत त्यांनी मी पुन्हा एकदा सत्यशोधनाची प्रक्रिया सुरू केल्याबद्दल न्यायालयाप्रति कृतज्ञता व्यक्त करतो,'' असे म्हटले आहे.
बिनबुडाचे आरोप करु नयेत
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालातून स्वा. सावरकरांना महात्मा गांधींच्या हत्येच्या कलंकातून निर्दोष मुक्त केले आहे. परंतु कपूर आयोगातील काही शेर्यांमुळे स्वा. सावरकरांचे विरोधक सावरकरांना गांधीहत्येत गोवण्याचा प्रयत्न करतात. आता न्यायालयानेच स्वातंत्र्यवीर सावरकरांना दोषमुक्त केल्याने विरोधकांनी त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करु नयेत.
डॉ. पंकज फडणीस,
विश्वस्त, अभिनव भारत संस्था