Tech भारत : वाय-फायमुळे कसे बदलले जग ...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018   
Total Views |


इंटरनेटचा शोध मानवी जीवनासाठी एक मैलाचा दगड बनून गेला असून, यामुळे मानवी जीवनाने एक वेगळी कलाटणी घेतली आहे. परंतु विकासाची ही गती टिकवायची असेल तर इंटरनेटची गती संथ पडता कामा नये. यासाठीच वाय-फाय सारख्या तंत्रज्ञानाचे महत्व विषद करणे गरजेचे ठरते. वाय-फायच्या संशोधनामुळे प्रत्येक क्षेत्र प्रभावित झाले आहे. वैयक्तिक ते सार्वजनिक जीवन व्हाया प्रोफेशनल जीवनात वाय-फायमुळे खूप मोठा परिणाम होत असताना आपण त्याचे साक्षीदार बनत आहोत. त्याचा विविध क्षेत्रावर होणारा परिणाम नक्की जाणून घेतला पाहिजे.
 
 
इंटरनेट वापरण्याची पद्धती

वाय-फायमुळे इंटरनेट प्रणाली अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकली, त्यामुळेच इंटरनेटचा वापर देखील वाढलेला आहे. आज आपण स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट अगदी सहजपणे वापरत असतो. किंबहुना २४ तासांतील अधिकाधिक वेळ या उपकरणांसोबत व्यतीत करत असतो. हे कशामुळे? तर सहज आणि जलद इंटरनेट कनेक्शनमुळे शक्य होते. जगाच्या अनेक क्षेत्रांवर आज वाय-फाय तंत्रज्ञान आधिपत्य गाजवत आहे ते यामुळेच. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे टी.व्ही. बघणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याचे एका सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. सन २००० साली जेव्हा वाय-फायचा वापर खूप लोकप्रिय नव्हता तेव्हा इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या आणि २०१७ सालची संख्या यात लक्षणीय फरक आहे. तेव्हा ऑनलाईन शॉपिंग, सोशल मिडिया, डिजिटल मार्केटिंग या बाबी असून देखील त्याचा उपयोग करण्याचे प्रमाण आजच्या तुलनेत नगण्य होते.
 
 
व्यावसायिक क्षेत्रातील बदल

शेअरेबल इंटरनेट कनेक्शन सहज उपलब्ध होऊ शकत असल्यामुळे कोठेही कनेक्टीव्हिटी नेणे भौगोलिक दृष्ट्या शक्य होऊ शकले आहे. या जोरावर व्हार्चूअली व्यवसाय करणारे कोट्यावधी व्यावसायिक जगभरात निर्माण होऊ शकले. त्यामुळेच ऑनलाईन शॉप सारख्या नवीन संकल्पनांना चालना मिळाली, यातून इ-कॉमर्सचे क्षेत्र मोठ्याप्रमाणात बहरले. त्याचबरोबर त्याची सुरक्षितता देखील टिकून राहिली.


यासोबतच आजचे कॉर्पोरेट युग झपाट्याने बदलले आहे. व्यावसायिक मिटिंग करण्यासाठी प्रत्येकवेळेला हजर राहण्याची आवश्यकता उरली नाही. अति-जलद इंटरनेट कनेक्टीव्हिटीमुळे परदेशातील गिऱ्हाईकाशी देखील व्हर्चूअली मिटिंग करता येणे शक्य झाले. त्यातून स्काईप, गुगल हँगआउट, व्हॉटस् अप व्हिडीओ कॉल, इत्यादी सारखे अॅप्लिकेशन निर्माण होऊ शकले.
डिजिटल मार्केटिंगचे वेगळे क्षेत्र आज निर्माण झाले आहे. ज्यातून व्यावसाईक क्षेत्राने कात टाकली आहे. डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आज ग्राहकांना आकर्षित केले जात आहे.
 
 
स्मार्ट सिटी

स्मार्ट सिटी ही भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. त्यामाध्यमातून शहरे डिजिटल सुविधांनी संपन्न केली जात आहेत. यात गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या बलाढ्य कंपन्या देखील भारतात गुंतवणूक करत आहेत. त्यातील महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे शहरांत ठिकठिकाणी वाय-फाय हॉट-स्पॉट बसविण्याचा. त्याचे मुख्य कारण म्हणजे वाय-फाय हा स्मार्ट सिटी प्रकल्पाचा पाया आहे.
 
 
जेव्हा स्मार्ट सिटी प्रकल्प अनेक ठिकाणी रुजेल त्यावेळी एकेका शहरातून हजारो टीबी डेटा तयार होणार आहे. यातील अनेक डेटा हा जनतेकरिता खुला असेल, त्याचे आदानप्रदान करण्याचे मुख्य कार्य हे जलद इंटरनेटच्या माध्यमातून होऊ शकेल. ते वाय-फाय प्रणालीवर पूर्णपणे अवलंबून आहे.


अशा अनेक क्षेत्रांवर आज वाय-फाय प्रणाली आपला प्रभाव टाकत आहे. याचा दिवसेंदिवस वाढणारा वापर बघता ही प्रणाली येत्या काळात निश्चितच समाजावर सकारात्मक परिणामकारक ठरणारी असेल.
- हर्षल कंसारा
@@AUTHORINFO_V1@@