भाजपचा विजय निश्चित; अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास
दावणगिरी : कर्नाटक निवडणुकांची तारीख नुकतीच जाहीर झाली असून भारतीय जनता पक्षाकडून आयोगाच्या या घोषणेचे स्वागत करण्यात आले आहे. तसेच या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष बहुमताने विजयी होणार असून येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होईल, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.
दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या शाह यांनी आज दावणगिरी येथे पत्रकार घेतली होती. या परिषदेमध्ये त्यांनी आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करत, भाजपचे आगामी निवडणुकांसाठीचे मुद्दे स्पष्ट केले. सिद्धरामय्या सरकार हे पूर्णपणे शेतकरी विरोधी असून रामय्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर आपला प्राण देण्याची वेळ आली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांकडे हे सरकार अजिबात लक्ष देत नाही, त्यामुळे यांना सत्तेवरून खाली खेचण्याची वेळी आली असल्याचे त्यांनी म्हटले.
तसेच राहून गांधी यांच्या लिंगायत समाजासंबंधी केलेल्या वक्तव्यावरून देखील शाह यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. कॉंग्रेस फक्त सत्तेसाठी भारतीय समाजाला धर्माच्या नावावर विभक्त करू पाहत आहे. 'लिंगायत' समाजाचा फक्त निवडणुकीपुरता फायदा करून घेणे हेच कॉंग्रेसचे मुख्य धोरण असून कॉंग्रेसचा सत्तापिपासूपणा हे भारतीय समाजासाठी अत्यंत घातक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता जनतेची कॉंग्रेसला योग्य उत्तर दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
शाह यांची संपूर्ण पत्रकार परिषद :
राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापू लागले आहे. राज्यात कॉंग्रेस पक्ष हा सत्ताधारी असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. कॉंग्रेसच्या हातातील बहुसंख्य राज्य जिंकल्यामुळे आता कर्नाटक देखील जिंकण्याचा मनसुबा भाजपने वारंवार जाहीर केला आहे. त्यासाठी भाजप सर्व प्रकारचे प्रयत्न करत असून कॉंग्रेस देखील आपले अस्तित्व टिकवण्यासाठी कंबर कसून प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.