नवी दिल्ली : लोकपाल बिल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीत उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय शिष्टमंडळ आज अण्णा हजारे यांची भेट घेणार आहे. नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर आज सरकारचे शिष्टमंडळ अण्णांची भेट घेणार असून राज्य सरकारचे देखील काही सदस्य या मंडळाबरोबर असणार आहेत.
अण्णा हजारे यांनी उपोषण सुरु करून आज तीन दिवस झाले आहेत. त्यामुळे अण्णांनी आपले उपोषण मागे घ्यावे, यासाठी त्याच्याबरोबर चर्चा करण्यासाठी सरकार आपले शिष्टमंडळ पाठवत आहे. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील अण्णांची आज भेट घेणार आहेत. अण्णांच्या भेटीसाठी महाजन हे काल नवी दिल्लीसाठी रवाना झाले. आज दुपारी शिष्टमंडळाबरोबर ते देखील अण्णांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
गेल्या २३ तारखेला अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर आपल्या उपोषणाला सुरुवात केली होती. या तीन दिवसांमध्ये अण्णांनी सरकारवर वेगवेगळे आरोप करत, सरकार भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यात अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली होती. तसेच सरकार लोकशाहीचा घात करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. त्यामुळे अण्णांचे हे उपोषण हे एक राजकीय नाट्य असल्याची टीका विविध स्तरातून होत आहे. दरम्यान पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांनी देखील अण्णांच्या या आंदोलनावर टीका केलेली आहे.