ठाणे : त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्ष जिंकला ते एक ’टीमवर्क’ होते. त्रिपुराचा विजय आता जुना झाला. आता ’त्रिपुरा’ सोडा, ’२०१९’ वर लक्ष केंद्रित करा, असे आवाहन भाजपचे त्रिपुरा प्रभारी सुनील देवधर यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले, तसेच देश जर सुरक्षित राहावा, असे वाटत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा दुसरी ’टर्म’ मिळायलाच हवी, असे म्हणत त्यांनी जनतेलाही साद घातली. ठाणे येथे दै. ’मुंबई तरूण भारत’ आयोजित विशेष कार्यक्रमात देवधर बोलत होते.
ठाण्यातील नौपाडा भागात भगवती मैदान येथे दै. ’मुंबई तरूण भारत’तर्फे ’त्रिपुरातील रक्तरंजित संघर्ष’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्रिपुरातील विधानसभा निवडणुकीत भाजपने प्राप्त केलेल्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरलेले सुनील देवधर यांचे व्याख्यान यावेळी आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर ’भारतीय विचार दर्शन’चे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, आमदार संजय केळकर, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले, जिल्हा सरचिटणीस रवींद्र आंग्रे, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश आंग्रे, दै. मुंबई तरूण भारतचे संपादक किरण शेलार, बिझनेस हेड रविराज बावडेकर आदी उपस्थित होते, तसेच महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्ष (प्रदेश) माधवी नाईक, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेश सचिव कृष्णन नाथन उपस्थित होते. ठाणे शहरातील भाजप कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आ. संजय केळकर, संदीप लेले, संजय वाघुले, युवा मोर्चाचे मयुरेश जोशी आणि ऋषिकेश आंग्रे यांनी सुनील देवधर यांचा सत्कार केला.
यावेळी सुनील देवधर म्हणाले की, देश सुरक्षित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची दुसरी टर्म मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी वैयक्तिक आशा आकांक्षा बाजूला ठेवणे गरजेचे आहे. सोशल मीडियावरून नकारात्मक लिखाण करणे बंद करा, यातून आपण आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहात, असेही देवधर यांनी सांगितले. तसेच, आता ’त्रिपुरा’ सोडा, ’२०१९’ वर लक्ष केंद्रित करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा दुसरा पंतप्रधान होऊ शकणार नाही, असेही आवाहन देवधर यांनी केले. तसेच, २०१९ मध्ये भाजपला ३०० हून अधिक जागा मिळतील, असा विश्र्वासही देवधर यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षभरात भाजपच्या ११ कार्यकर्त्यांची त्रिपुरात हत्या झाली. मला या कार्यक्रमात मिळालेली शाल मला मिळालेली नसून त्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांवर ओढलेली असल्याचेही देवधर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरेश हावरे यांनी केले. डॉ. सुरेश हावरे यांनी यावेळी सुनीलजींच्या कष्टाचे कौतुक केले व कॉंग्रेसमुक्त भारताबरोबरच कम्युनिस्टमुक्त भारताकडेदेखील वाटचाल सुरु असल्याचा उल्लेख केला. पुढच्या काळात सुनीलजींनी केरळही जिंकून द्यावे, असे आवाहन केले. तर संपादक किरण शेलार, बिझनेस हेड रविराज बावडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भटू सावंत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक नगरसेवक सुनेश जोशी, मृणाल पेंडसे आणि प्रतिभा राजेश मढवी यांनी विशेष प्रयत्न केले.
त्रिपूरातील भाजपचा उलगडला प्रवास
सुनील देवधर यांनी यावेळी त्रिपुरातील भाजपचा प्रवास उलगडला. तसेच, यापूर्वी सत्तेत असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर व माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या कारभारावरही त्यांनी सडकून टीका केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच ’कम्युनिस्ट हे हिरवे साप आहेत’ असे म्हटले होते. त्यामुळे या सापांचे डोके ठेचलेच पाहिजे, त्यांना हद्दपार केले पाहिजे, अशा शब्दांत देवधर यांनी कम्युनिस्टांवर हल्लाबोल चढवला.